पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे-मिरज या २८० किमी लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम अंतीम टप्यात आले आहे. सध्या २१३ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित ६७ किलोमीटर मार्गाच्या दुहेरीकरणास आणखी सहा महिने कालावधी लागणार आहे. तयार झालेल्या २१३ किलोमीटर दुहेरी मार्गावरून माल व प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेने पुणे-मिरज या २८० किलोमीटर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम २०१६ मध्ये सुरू केले. हे काम मे २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. दरम्यान, जुन्या रेल्वेमार्गाचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, सातारा व पुणे जिल्ह्यात भूसंपादनासाठी शेतकर्यांच्या हरकती व इतर अडचणींमुळे दुहेरीकरणाच्या कामास विलंब होत आहे.
तसेच करोना काळातही काही दिवस काम बंद असल्याचा फटका या कामाला बसला आहे. सध्या तारगाव-मसूर व मसूर-शिरवडे अशा दोन टप्प्यांतील १८ किलोमीटरचे दुहेरीकरण पूर्ण झाल्याने शिरवडे ते तारगाव दरम्यान वेगाच्या चाचणीत जास्तीत जास्त १३० किलोमीटर प्रतितास वेग गाठण्यात आला. ही चाचणी यशस्वी झाल्याने सुरक्षा आयुक्तांनी या मार्गावरून ताशी ९० किलोमीटर वेगाने गाड्या चालविण्यास मान्यता दिली आहे.