मुंबई – राज्याच्या औरंगाबाद येथे होणारा आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर गेला असल्याचा दावा शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला असून त्यावरून त्यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. सरकारला हे प्रकल्प गेल्याची माहिती तरी आहे काय, असा खोचक सवाल त्यांनी विचारला आहे.
वेदांत फॉक्सकॉन आणि बल्क ड्रग पार्क हे दोन मोठे प्रकल्प अगोदरच बाहेर गेल्याने सरकारवर टीकेची झोड उठली आहे. त्यातच आता प्रस्तावित मेडीसीन डिव्हाईस पार्कही राज्याबाहेर गेल्याचा दावा आदित्य यांनी केला आहे. राज्यात चांगल्या पायाभूत सुविधा आहेत.
प्रकल्पांसाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध असूनही प्रकल्प बाहेर जात आहेत याबद्दल संताप व्यक्त करत त्यांनी सरकारच्या उदासिनतेबाबत नाराजी व्यक्त केली. दरम्यान, आता जो मेडीसीन डिव्हाईस पार्क दुसऱ्या राज्यात गेला आहे त्याबद्दल सरकारने माहितीही दिली नाही. मुळात सरकारला तरी याची माहिती होती का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.