वाराणसी – उत्तर प्रदेशातील आणखीन एका विरोधी पक्षाच्या उमेदवारावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल पोलिसांनी कॉंग्रेसचे उमेदवार अजय राय यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. अजय राय यांनी 31 जानेवारीला झालेल्या सभेदरम्यान हे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या संदर्भातील चौकशी केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अजय राय हे उत्तर प्रदेशातील माजी आमदार असून विधानसभेवर पाचवेळा निवडून गेले होते. वाराणसीमधील पिंद्रा येथून ते कॉंग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. एका पोलीस उपनिरीश्रकाने या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. 31 जानेवारी रोजी राय यांनी परवानगी न घेता एका सभेला संबोधित केले होते. या सभेमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुक्यमंत्री आदित्यनाथ यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर भाजपने राय यांच्या अटकेची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
यापूर्वी बिजनौर येथील राष्ट्रीय लोक दलाचे उमेदवार डॉ. नीरज चौधरी यांच्याविरोधातही देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौधरी यांच्या र्रली दरम्यान त्यांच्या काही समर्थकांनी “पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्यामुळे त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र चौधरी यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.