कौशांबी/लखनौ – उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यात मंगळवारी पहाटे पोलिसांशी झालेल्या चकमकीत एक वॉंटेड गुन्हेगार ठार झाला आहे. तो अनेक गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवा होता. गुफरान असे त्याचे नाव आहे.
जिल्ह्यातील सामदा गावाजवळ पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्ससोबत झालेल्या चकमकीत प्रतापगड जिल्ह्यातील गुफरान जखमी झाला, त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा आणि लुटमारीचे 12 गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्या अटकेवर एकूण 1.25 लाख रुपयांचे बक्षीस लावण्यात आले होते. प्रयाग राज आणि सुलतानपूर या दोन्ही पोलिसांनी त्याच्यावर हे बक्षिस लावले होते. गेले अनेक दिवस तो फरारी होता.
गुफरानकडून एक कार्बाइन, पिस्तूल आणि एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारच्या सहा वर्षांच्या काळशत आत्तापर्यंत विविध चकमकींमध्ये 183 गुन्हेगार ठार झाले आहेत.
मे महिन्यात, उत्तर प्रदेश एसटीएफने मेरठमधील एका गावातील चकमकीत 18 खून प्रकरणातील आरोपी अनिल दुजाना याला गोळ्या घालून ठार केले होते.
योगी अदित्यनाथ सरकारच्या काळात आत्तापर्यंत राज्यात 10,900 हून अधिक पोलिस चकमकी झाल्या आहेत. या चकमकींमध्ये 23,300 गुन्हेगारांना अटक करण्यात आली आणि 5,046 जखमी झाले आहेत.