मुंबई :- बीसीसीआयने अखेर भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्याबाबत घोषणा केली. 2025 साली भारतीय संघ इंग्लंडचा दौरा करणार असून अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.
यंदाच्या मोसमात भारतीय संघाचे वेळापत्रक अत्यंत व्यस्त असल्याने तसेच पुढील वर्षीच्याही मालिका निश्चित झालेल्या असल्याने बीसीसीआयने 2025 साली हा दौरा निश्चित केला आहे. या पाच कसोटी सामन्यांची ठिकाणे निश्चित केली नसली तरीही यातील सामने लॉर्डस, एजबस्टन, हेडिंग्ले, ओल्ड ट्रॅफर्ड व बर्मिंगहॅम येथे होतील असे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचाच हा दौरा एक भाग राहणार आहे. भारतीय संघ पुढील महिन्यात वेस्टइंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेने करणार आहे. त्यानंतर भारतीय संघ कसोटी मालिका थेट डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळेल.
त्यानंतर जानेवारी-फेब्रुवारी 2024 साली 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. तसेच बांगलादेश विरुद्ध सप्टेंबर-ऑक्टोबर 2024 साली कसोटी मालिका खेळेल. बीसीसीआयच्या आगामी बैठकीत याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येणार असून याच बैठकीत सामन्यांची ठिकाणे निश्चित होतील, असेही सांगण्यात
आले आहे.