Jitendra Awhad – “राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता, त्यांनी 14 वर्ष वनवास भोगला होता, मग ते शाकाहारी कसे असू शकतात?” असं वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी (दि. 03) केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात श्रीराम भक्तांमध्ये संतापाची लाट उसळळी आहे. राम भक्तांकडून आव्हाड यांच्यावर मोठी टीका केली जात आहे. अशातच आव्हाड यांची जीभ छाटणाऱ्यास धर्मयोद्धा पुरस्काराने सन्मानित करणार असल्याची घोषणा हिंदू महासभेच्या वतीने करण्यात आली आहे.
हिंदू महासभेचे प्रदेश संघटन मंत्री धनसिंह सूर्यवंशी यांनी ही घोषणा केली आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्या प्रकरणी जालन्यात हिंदू महासभा आक्रमक झाली आहे.
सूर्यवंशी म्हणाले की, “राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि शरद पवार साहेबांच्या कृपेने जगणारे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणजेच जीतूद्दीन हे काही लोकांना खुश करण्यासाठी, काही लोकांच्या दाढ्या कुरवळण्यासाठी वारंवार भारतीय संस्कृती, हिंदू संस्कृती, देवी देवतांवर ते टीका टिप्पणी करत असतात. प्रसिद्धी झोतात येण्यासाठी ते असे करतात. प्रभू रामचंद्र भारतीय संस्कृतीचे अस्मिता आहे. हा देश प्रभू रामचंद्र, कृष्ण, बुद्ध, महावीर, गुरू नानक या सर्वांचा आहे. याठिकाणी मारुतीची उपासना केली जाते. ज्या प्रभू रामचंद्रांनी 14 वर्षांचा वनवास भोगला, त्या काळात त्यांनी कंदमुळे, फळांचे सेवन करून 14 वर्षे काढले.
अशा देव स्वरूप प्रभू रामचंद्र यांच्यावर आव्हाड यांनी टीका टिप्पणी केली. लाज वाटली पाहिजे. बारामतीच्या मटणाच्या तुकड्यावर जगणारे दोन तोंडी जितेंद्र आव्हाड यांची जीभ छाटणाऱ्याला हिंदू महासभा सर्वोच्च धर्मयोद्धा या पुरस्काराने पंढरपुरामध्ये सन्मानित करणार आहे. यापुढे भारतीय संस्कृतीवर होणारे हल्ले सहन केले जाणार नाही, हे हिंदू महासभेच्या वतीने इशारा देत आहोत, असे सूर्यवंशी म्हणाले.