मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेनेने (उद्धव ठाकरे गट) त्यांच्यात ठरलेल्या जागा वाटपाची माहिती दोन दिवसांत जाहीर करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. याबाबत वंचितने शनिवार (24 फेब्रुवारी) काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे.
महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला दोन दिवसाच्या आत त्यांच्या जागासंदर्भात माहिती द्यावी. म्हणजे आम्हाला निर्णय घेणे सोपे जाईल. ही अंतिम मुदत नाही पण आमच्या सोयीसाठी हे आवश्यक आहे. जेणेकरुन आम्हाला कोणाशी चर्चा करायची आहे हे समजू शकेल, असे या पत्रात म्हटले आहे.
किमान समान कार्यक्रमासाठी आमचे प्रस्तावित 39 मुद्दे काँग्रेसने स्वीकारल्याचे आम्ही स्वागत करतो. आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने किमान समान कार्यक्रमासाठी त्यांचा मसुदा आम्हाला दाखवावा.
मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप-आरएसएसचा आगामी लोकसभा निवडणुकीत पराभव करण्यासाठी आघाडीतील तिन्ही पक्षांच्या मसुद्यासह एक किमान समान कार्यक्रम तयार करणे महत्वाचे आहे, असेही वंचितने पत्रात म्हटले आहे.