नवी दिल्ली : भारतातील अंजू नावाची महिला आपली दोन मुले आणि नवरा अरविंदला सोडून पाकिस्तानात गेली आणि तेथे इस्लाम धर्म स्वीकारून तिचा फेसबुक मित्र नसरुल्लाहशी निकाह केला. खैबर पख्तनुख्वा या ठिकाणी या दोघांनी निकाह केला आहे. निकाहाच्या आधी अंजूने इस्लाम धर्म स्वीकारला आणि स्वतःचे नाव बदलून आता फातिमा असे ठेवले आहे. या सर्व घडामोडीनंतर आता भारतातील अंजूच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
अंजूचे वडील गया प्रसाद यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना,“ज्या दिवशी अंजू भारतातून पाकिस्तानात केली, त्या दिवसापासून ती आमची मुलगी नाही. तिच्याशी आमचं नातं संपलं आहे. तिच्या डोक्यात हे षडयंत्र कधीपासून सुरू होतं आम्हाला माहिती नाही. मात्र, आता आमचं तिच्याशी कोणतंही नातं नाही.”असे भावुक शब्द त्यांनी काढले.
“माझ्या जावयाचा सकाळी फोन आला होता. त्याने मला काही व्हिडीओ पाठवले आणि अंजूचे लग्न होत असल्याचे सांगितलं. मी त्याला सांगितलं की, यात मी काय करू शकतो. ज्या ठिकाणी तो आहे त्याच ठिकाणी मी आहे. माझं जावयाशी एवढंच बोलणं झालं. बाकी इतर कोणतंही बोलणं झालं नाही,” असेही गया प्रसाद म्हणाले.
पुढे बोलताना गया प्रसाद म्हणाले,“अंजू पाकिस्तानात लग्न करत असेल, तर करू द्या. त्यात मी काय करू शकतो. आमची मुलगी असं काही करेल असं माझ्या स्वप्नातही कधी आलं नाही. मला तर यावर बोलायलाही लाज वाटत आहे. कारण ही केवळ आमची गोष्ट नाही, तर संपूर्ण भारताची गोष्ट आहे. तिने जे केलं आहे ते खूप लज्जास्पद आहे.” “अंजूला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुलं आहेत. असं असूनही तिने हे पाऊल उचललं. तिची मानसिकता चांगली नाही. तिला मी एखाद्या गोष्टीला नाही म्हटल्यावर ती हो हो म्हणायची आणि तिला हवं तेच करायची. तिचा असा स्वभाव आहे,” असल्याचे अंजुच्या वडिलांनी म्हटले.
तसेच पुढे बोलताना त्यांनी “ती न विचारता सासरहून निघून गेली. याची माझ्या पत्नीलाही माहिती नाही. तेव्हापासून आम्ही खूप नाराज आहोत. ती आपल्या दोन मुलांना सोडून का गेली? तिने असं पाऊल का उचललं? ही खूप लज्जास्पद गोष्ट आहे. मी अशा मुलीचा बाप झालो याची मला लाज वाटते,” असेही गया प्रसाद यांनी यावेळी सांगितले.