मुंबई – एसटी महामंडळातील कमी पगार आणि अनियमिततेला कंटाळून जळगाव आगारातील वाहक मनोज अनिल चौधरी (वय-30, रा. कुसुंबा, ता. जळगांव) यांनी आज (सोमवारी) सकाळी 8.30 वाजण्याच्या दरम्यान राहत्या घरात आत्महत्या केली. या घटनेनंतर अनेकांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली होती. या घटनेनंतर सरकारला जाग आली आली आहे. तासाभरात महिन्याचं वेतन आणि दिवाळी बोनस देण्यात येणार आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली.
अनिल परब यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी महिन्याभराचे वेतन देण्यात येणार असल्याची माहिती दिली. ‘पुढील तासाभरात एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे. उरलेले थकित वेतन हे देखील लवकरच कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होईल, त्यासाठी कर्ज घेतले जाणार आहे’. त्याची प्रक्रिया सुरू आहे, असं अनिल परब यांनी म्हटले आहे.
एसटी कर्मचारी मनोज चौधरी यांची सुसाईड नोट –
मनोज चौधरी यांनी आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. ‘एसटी महामंडळातील कमी पगार व त्यातील अनियमितता यास कंटाळून मी आत्महत्या करीत आहे. यास जबाबदार एसटी महामंडळातील कार्यपद्धती व आपले मराठी माणसाचे ठाकरे सरकार आहे. (शिवसेना) माझ्या घरच्यांचा यात काहीही संबंध नाही. संघटनांनी माझ्या पीएफ आणि एलआयसी वीमा हा माझ्या कुटुंबाला मिळवून देण्याचा प्रयत्न करावा’ असा मजकूर मनोज चौधरी यांनी चिठ्ठीत लिहिला आहे.