बदायू (उत्तर प्रदेश) : दिल्लीतील बलात्कारानंतर पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विकृतीचा कळस गाठणारी आणि निर्भयाची पुनरावृत्ती झाल्याची घटना समोर आल्याने देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. 50 वर्षीय अंगणवाडी सेविकेवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपींनी या महिलेचे अक्षरश: लचके तोडले.
पूजा करण्यासाठी गेलेल्या 50 वर्षीय अंगणवाडी सेविकेवर पाशवी अत्याचार करण्यात आले. त्यानंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या महिलेच्या शवविच्छेदनातून मन हेलावून टाकणारी माहिती समोर आली आहे. पोस्टमार्टम अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार महिलेच्या गुप्तांगात रॉड खुपसण्यात आला होता. याशिवाय डावी बरगडी, पाय आणि फुफ्फुसांना देखील गंभीर इजा पोहोचली होती. डावा पाय आणि बरगडी आतून तुटली होती. महिलेचा अति रक्तस्राव झाल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. मात्र एक आरोपी फरार असून पोलिसांकडून शोध सुरू आहे. निर्भयाच्या या पुनरावृत्तीमुळे पुन्हा एकदा उत्तर प्रदेश हादरले आहे. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील बदायू इथे घडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.
ही धक्कादायक घटना अघैती पोलीस ठाण्याच्या परिसरात घडली आहे. अघैती गावातील महिला रविवारी नेहमीप्रमाणे गावातील जवळच्या मंदिरात पूजेसाठी गेली. त्यावेळी प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार एका इसमाने कारमधून या महिलेचा मृतदेह आणला आणि त्यानंतर तिला घराजवळ टाकून फरार झाला. याबाबत स्थानिकांनी माहिती देऊनही वेळेत पोलीस घटनास्थळी पोहोचले नाही, असा आरोप करण्यात आला आहे.
बदायू सामूहिक बलात्कार आणि हत्ये प्रकरणी संपूर्ण गावात संतापाची लाट पसरली आहे. पीडितेचा मृतदेह 18 तासांनी शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या प्रकरणी पोलीस ठाण्यातील प्रभारीवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर वरिष्ठ पोलिसांनी 4 जणांची टीम नेमली असून आरोपीचा तपास सुरू आहे.