म्हसवड – राज्य सरकारने एका महिन्यापूर्वी सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानातून दिवाळीनिमित्त सर्व कार्डधारकांना साखर, रवा, हरभरा डाळ, मैदा व एक किलो गोडेतेल या पाच वस्तू असलेला “आनंदाचा शिधा’ देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. मात्र, दिवाळीची पहिली आंघोळ झाल्यावर सरकारी आनंदाचा शिधा आला खरा. मात्र, ऐन दिवाळीत या आनंदाच्या शिध्यामधून दिवाळी गोड करणारी साखरच गायब झाल्याने गरीबांच्या घरची दिवाळी गोड झालीच नाही.
दिवाळीची पहिली आंघोळ झाली तरी सरकारचा आनंदाचा शिधा गरीबांच्या घरात सोडा, रेशनिंग दुकानातही पोचला नाही. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी आनंदाचा शिधा आला. पण नेटवर्क नसल्याने रेशन दुकानदारांची मशिन चालू होत नसल्याने अनेकांची अडचण झाली. अखेर ऑनलाईन ऐवजी ऑफलाइनने शिध्याचे रात्री उशिरापर्यंत दुकानदार वाटप करत होते. मात्र, सरकारने जाहीर केलेल्या पाच वस्तुंमधील साखरच या किटमध्ये नसल्यामुळे गरीबांच्या दिवाळीचा आनंदाचा “आनंदाचा शिध्या’ने हिरमोड केल्याने सर्व राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील या किटमधील साखर कोठे गायब झाली असा प्रश्न उपस्थित होत आहे. पाच वस्तू असल्याची खात्री केल्याशिवाय आनंदाचा शिधा घेऊ नये, अशा सूचना या पॅकिंगवर केल्याने ग्राहक व दुकानदार यांच्यात जोरदार खटके उडत होते.
योजनांचे अनुदानही नाही…
संजय गांधी निराधार, विधवा, विधुर, निराधार, श्रावणबाळ वृध्द, अपंग आदी योजनांतून त्यांच्या उदरनिर्वाहसाठी मिळणारा भत्ता बॅकेत तीन महिन्यांपासून आला नसल्याने या सर्वाची दिवाळी गोड करण्यात शिंदे भाजप सरकार अपयशी ठरले आहे. रखडलेले अनुदान दिवाळीत येणार या आशेवर अनेक निराधार महिला, पुरुष, अपंग लोकांचे अनुदान ऐन दिवाळीतही आले नसल्याने त्या सर्वाची दिवाळी या सरकारने कडू केल्याची प्रतिक्रिया दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष नागेश खांडेकर यांनी दिली.