डीआरए संस्थेला पुन्हा 9 कोटी मिळणार : स्थायी समितीची मंजुरी
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून अमृत योजनेतील कामांच्या सल्लामसलतीसाठी डीआरए या सल्लागारी संस्थेवर थेट पध्दतीने कोट्यवधींची उधळपट्टी करण्यात येत आहे. पहिल्या एक व दोन टप्प्यासाठी या ठेकेदाराला सुमारे 13 कोटी रुपये अदा केले आहेत. तसे असताना आणखी तिसऱ्या टप्प्याच्या नावाखाली तब्बल 8 कोटी 91 लाख रुपये याच सल्लागारी संस्थेला देण्याच्या प्रस्तावाल स्थायी समितीमध्ये मान्यता देण्यात आली. पिंपरी चिंचवड महापालिकेची स्थायी समितीची सभा बुधवारी महापालिका भवनमध्ये पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडेगिरी होते.
केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड शहरामध्ये जलपुरवठ्याचे काम सुरू आहे. शहरातील सर्व नागरिकांना 24 बाय 7 पाणी मिळावे, हा या योजनेचा उद्देश आहे. शहरामध्ये सर्व नागरिकांना समान पाणीपुरवठा करता यावा यासाठी पाणी कपात सुरु करण्यात आली आहे. त्यातच पाणीपुरवठा विभागाच्या अपयशामुळे अमृत योजनेचेही काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे धरणांमध्ये पाणीसाठा असूनही नागरिकांना सुरळित पाणीपुरवठा होत नाही.
गेल्या दोन वर्षांपासून अमृत योजनेचे काम सुरू आहे. हे काम 60 टक्के पूर्ण झाला असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी वास्तविक परिस्थिती वेगळी आहे. असे असतानाही प्रशासनाच्या वतीने या योजनेची सल्लामसलत करण्यासाठी एकाच संस्थेच्या नावावर वारंवार शिक्कामोर्तब केले जात आहे. अमृत योजनेच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी डीआरए कन्स्लंटट यांची नेमणूक करण्यात आली आहे. याच संस्थेला वारंवार मुदतवाढ देण्यात येते. या कामाच्या टप्पा एकसाठी 8 कोटी 12 लाख 51 हजार, टप्पा दोनच्या कामासाठी 4 कोटी 84 लाख 80 हजार रूपये या संस्थेला देण्यात आले आहेत.
नागरिकांची गैरसोय
अमृत योजनेअंतर्गत नवीन जलवाहिनी टाकणे, जुने नळजोड नवीन एमडीपीई पाईपने बदलणे, आवश्यक त्या ठिकाणी नवीन टाक्या उभारणे आदी कामे ईपीसी पद्धतीने शहरातील अनेक भागात सुरू आहेत. हे काम वेगवेगळ्या 4 विभागात 4 ठेकेदारांमार्फत केले जात आहे. दोन कामे अरिहंत कन्स्ट्रक्शन, पी. पी. गोगडे व शिवरत्न कन्स्ट्रक्शन याच्यामार्फत सुरू आहे. हे काम जानेवारी 2018 ला सुरू झाले आहे. ही कामे संथ गतीने सुरू असून, संपूर्ण शहर खोदून ठेवल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे, अशा तक्रारी आहेत. हे काम आतापर्यंत केवळ 60 टक्के झाले आहे.
अमृत योजनेतील कामांच्या व्यवस्थापन व सनियंत्रणासाठी या सल्लागारी संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. या योजनेचे काम 60 टक्के पूर्ण झाले आहे.
– मकरंद निकम, सहशहर अभियंता पाणीपुरवठा