पुणे – तलाठी भरती परीक्षा ही राज्यात अतिशय पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली. या परीक्षेत कोणताही गैरव्यवहार झाल्याचा पुरावा कोणीही दिल्यास चौकशी केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तलाठी भरती परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
या प्रकरणी विशेष तपास पथक नेमून चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. यावर विचारले असता उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, वडेट्टीवार यांनी या प्रकरणी पुरावे सादर करावेत. पुरावे योग्य असल्यास चौकशी करून ही परीक्षा रद्द केली जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल.
राज्यात तलाठी भरतीच्या रिक्त जागांसाठी भूमि अभिलेख विभागाने परिक्षा घेतली. राज्यभरातून 4 हजार 466 जागांसाठी 8 लाख 64 हजार 960 उमेदवारांनी परिक्षा घेतली. अर्जांची संख्या मोठी असल्याने तीन टप्प्यात आणि एका दिवसात तीन सत्रात घेण्यात आली. उमेदवारांची संख्या जास्त असल्याने गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी मोठा कालावधी लागला. ही परिक्षा टीसीएस या कंपनीमार्फत घेण्यात आली.
गुणवत्ता यादी नुकतीच प्रसिध्द करण्यात आली. गुणवत्ता यादीबाबत काही शंका उपस्थित झाल्याने विरोधकांकडून आरोप करण्यात येत आहे. मात्र भूमिलेख विभागातील अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार गुणवत्ता यादी तयार करताना एका संगणक प्रणालीची मदत घेण्यात आली आहे. उमेदवारांना प्राप्त गुणांवर सामान्यीकरण प्र्क्रिया पूर्ण करण्यात आली आहे. त्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली आहे. आता अंतिम निवड यादी तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.