ज्ञानेश्वर खिलारी; जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे
सातारा – खेडी स्वच्छ व सुंदर राहावीत, नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी जिल्ह्यात सोमवारी (दि. ८) महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार असून या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी केले आहे.
सोमवारी सकाळी ८ ते दुपारी १२ या कालावधीत हा उपक्रम जिल्हयातील सर्व गावामध्ये व ग्रामपंचायतीमध्ये राबवण्यात येणार आहे. चार तास श्रमदानाव्दारे स्वच्छता करण्यात येणार आहे. या उपक्रमात ग्रामस्थांव्दारे प्रत्यक्ष स्वच्छता करण्यात येणार असून या स्वच्छता उपक्रमाचा दृष्य परिणाम दिसणार आहे. प्रत्येक वार्डामध्ये ग्रामपमचायत सदस्य यांच्या पुढाकाराने प्रथम वार्ड स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यानंतर सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात येणार आहे.
हा उपक्रम राबवण्यासाठी वॉर्ड, ग्रामपंचायती अंतर्गत जास्त कचरा असलेले क्षेत्र, रेल्वे लाईन, बस स्थानके, विमानतळ, राष्ट्रीय, राज्य महामार्गाच्या शेजारील जागा, जलस्त्रोत, नदीघाट, झोपडपट्टया, पुलाखालच्या जागा, बाजारपेठा, गल्ल्या, धार्मिक स्थळे, सार्वजनिक व खाजगी कार्यालयांचे परिसर, पर्यटन स्थळे, टोलनाके, प्राणी संग्राहालय, गो-शाळा, डोंगर, रहिवासी क्षेत्र, आरोग्य संस्था, आसपासचा परिसर, अंगणवाडी परिसर, शाळा व महाविद्यालय परिसर .सर्व धार्मिक स्थळांचा परिसर, क्षेत्रातील महत्वाचे ठिकाण अशा ठिकाणांची स्वच्छता करण्यात येणार आहे.
या उपक्रमासाठी वॉर्ड, ग्रामपंचायत हे एक भौगोलिक एकक समजण्यात येणार आहे. त्येक वॉर्डत प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. महिला बचतगट, युवा मंडळे, सहाय्यकारी संस्था (एनजीओ) ग्रामस्तरावरील सर्व शासकीय व निमशासकीय अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी आणि स्थानिक जनतेसह स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच अन्य मान्यवरांना निमंत्रित करण्यात येणार आहे. या स्वच्छता उपक्रमाकरिता आवश्यक असलेले झाडू, केर भरणी, कचरा पेटया, थैल्या इत्यादी साहित्यांची व्यवस्था ग्रामपंचायतींमार्फत करण्यात येणार आहे.
ग्रामपंचायत स्तरावर महास्वच्छता उपक्रमाची सुरवात ग्रामस्थांनी कचरा न करण्याबाबतची प्रतिज्ञा घेवून करायची आहे. या कार्यक्रमांची अंमलबजावणी होणेसाठी ग्रामपंचायत, महसुली गावनिहाय नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महास्वच्छता उपक्रमात जास्तीत जास्त ग्रामस्थांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन ज्ञानेश्वर खिलारी यांनी केले आहे.