नवी दिल्ली – पाकिस्तानची अर्थव्यवस्था सुधारायची असेल, तर राजकीय हस्तक्षेप टाळून पाकिस्तानी व्यावसायिकांनी भारताशी व्यापार करणे आवश्यक आहे. भारतासोबतचे संबंध सुधारले तर आपली राजकीय प्रतिमा मलिन होईल, ही भीती पाकिस्तानच्या नेतृत्वाला दूर करावी लागेल, असे प्रतिपादन पाकिस्तानी वंशाचे अमेरिकन व्यापारी साजिद तरार यांनी केले आहे. साजिद तरार ( Sajid Tarar ) यांनी उभय देशांमधील संबंध चांगले राहावेत, असे म्हटले आहे. ( Sajid Tarar modi fan )
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गेली नऊ वर्षे त्यांच्या देशाला कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढत, प्रगतीची नवनवी शिखरे गाठत आहेत. त्यांची अर्थव्यवस्था जगात पहिल्या पाच क्रमांकात पोहोचली असून शास्त्रीय संशोधनातही देश आघाडीवर आहे. त्यामुळे मोदींच्या नव्या भारताशी जुळवून घेत पाकिस्तानने भारताशी चांगले संबंध प्रस्थापित करणे आवश्यक आहे. त्यासाठी आता चेंडू पाकिस्तानच्या कोर्टात आहे, याकडेही तरार यांनी लक्ष वेधले आहे.
साजिद तरार म्हणाले की, याआधी मोदींनी एक मोठी राजकीय जोखीम पत्करून पाकिस्तानला भेट दिली होती. तेव्हा ते पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या घरी गेले होते. हे खूप मोठे पाऊल होते. ते एक मजबूत नेते आहेत आणि मी त्यांचा प्रशंसक आहे.
साजिद तरार हे अमेरिकन मुस्लिम ऑर्गनायझेशनचे संस्थापक आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक आहेत. तरार म्हणाले की, मी अनेकदा भारतात आलो आहे आणि माझे भारताशी घट्ट नाते आहे. मला भारतात खूप प्रेम मिळते. आपण सर्व एकाच उपखंडात शतकानुशतके राहत आहोत, हे कधीही विसरता कामा नये. एकाच वेळेस स्वतंत्र झालेल्या दोन शेजारी देशांत आज जमीन-आसमानाइतके अंतर पडले आहे.
तरार पुढे म्हणाले की, भारताशी व्यापार आणि पर्यटन वाढवण्यासाठी पाकिस्तानी नेतृत्वाला मोठी पावले उचलावी लागतील. भारतासोबतचा व्यापार हा पाकिस्तानच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. पाकिस्तानला भारताशी संबंध सुधारावे लागतील. अफगाणिस्तान आणि इराणमधूनही. पाकिस्तानलाही चीनसोबतच्या व्यापारात समतोल साधण्याची गरज आहे. भारत आज केवळ प्रादेशिक शक्ती नाही तर जागतिक शक्ती म्हणूनही उदयास येत आहे. मला आशा आहे की भारत देखील संबंध सुधारण्यासाठी आपल्या बाजूने प्रयत्न करेल.