नवी दिल्ली – संसदेचे हिवाळी अधिवेशन ४ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. अधिवेशन प्रारंभाच्या दोन दिवस आधी म्हणजे २ डिसेंबरला मोदी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.
साधारणपणे अधिवेशन प्रारंभाच्या आदल्या दिवशी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचा प्रघात आहे. मात्र, ३ डिसेंबरला ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. त्या निकालांचा विचार करून सर्वपक्षीय बैठक नेहमीपेक्षा एक दिवस आधी बोलावण्यात आल्याचे सूचित होत आहे. आगामी अधिवेशनात काही महत्वाची विधेयके मार्गी लावण्याचा सरकारचा प्रयत्न असेल.
त्याशिवाय, अधिवेशन काळात तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या विषयीचा आचार समितीचा अहवाल लोकसभेत मांडला जाईल. महुआ यांच्यावर संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप आहे. त्या प्रकरणी त्यांची खासदारकी रद्द करण्याची शिफारस आचार समितीने केल्याचे समजते. इतरही विविध कारणे, मुद्द्यांमुळे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणूक निकालांचा परिणाम अधिवेशनात दिसू शकतो. ते निकाल भाजपला अनुकूल ठरल्यास सत्ताधाऱ्यांचे पारडे अधिवेशनात जड झालेले दिसेल. त्याउलट, निकाल कॉंग्रेसच्या बाजूने गेल्यास विरेाधक अधिवेशनात अधिक आक्रमक बनलेले दिसतील.