– अरुण गोखले
“वाटेकरी’ एक चार अक्षरी छोटासा शब्द. पण त्या एका शब्दाची ताकद किती आहे हे आपल्याला त्याची अनुभव-प्रचिती आल्याशिवाय कळत नाही. जीवनात आपल्या सुखाच्या, वैभवाच्या, बहाराच्या आणि उत्कर्षाच्या काळात आपल्या सुखानंदाचे वाटेकरी व्हायला येणारे अनेक लोक माहीत आहेत. पण या जीवनातला एक अत्यंत कटू पण तेव्हढाच सत्य असा हाच अनुभव आहे की,
इथे सारेजण हे केवळ सुखाचे सोबती आहेत. तुमच्या सुुखात, आनंदात तुमच्या जवळचे सारेजण भागीदार, वाटेकरी होतात; पण जेव्हा तुम्ही संकटात, दु:खात किंवा एखाद्या कष्ट, भोगात अडकता त्या वेळी सारेजण तुमच्यापासून चार हात दूर राहतात. ते शारीरिक, मानसिक क्लेश, दु:ख, यातना या तुमच्या तुम्हालाच एकट्याने सोसाव्या आणि भोगाव्या लागतात.
एखाद्या अपघाताने तुम्हास लुळेपांगळे केले, एखाद्या असाध्य रोगाने तुम्हास ग्रासले, तुम्ही दवाखान्यात बिछान्यावर जाऊन पडलात तर तिथे ते सारं तुम्हा एकट्यालाच सोसावं लागतं. कुटुंबाकरता जरी तुम्ही गुन्हेगारी केली आणि पकडला गेलात, तुम्हास शिक्षा झाली तर ती तुम्हाला एकट्यालाच त्या कोठडीत भोगावी लागते. तिथे आपली सोडवणूक करणारा कोणीच सोबत येत नाही. मग अशा वेळी जेव्हा सारं जग हे तुमच्याकडे पाठ फिरवते तेव्हा तुम्हास देव आठवतो.
इथे आठवण होते ते वाल्यास त्याच्या पापाचे वाटेकरी व्हायला नकार दिलेल्या त्याच्या कुटुंबीयांची. त्यास झालेल्या पश्चातापाची आणि शेवटी एका रामनामाच्या संगतीने त्याचा उद्धार झालेल्या त्या गोष्टीची. वाल्या कोळ्याला नारदांनी सांगितले की, जा आणि तुझ्या घरच्यांना विचारून ये की तुझ्या आजवरच्या सुखात, चैनीत तुझे सोबती झालेले तुझे लोक तुझ्या उद्याच्या पापाचे वाटेकरी होणार आहेत का? खरं तर वाल्या मोठ्या आशेने घरच्या लोकांकडे गेला. त्यांना सारा प्रकार सांगून तुम्ही माझ्या पापाचे वाटेकरी होणार का?
म्हणून विचारले. तेव्हा सर्वांनीच त्यास पापाचे वाटेकरी होण्यास नकार दिला. दु:खीकष्टी वाल्या नारदांकडे आला. झाला वृत्तांत सांगून त्याने सोडवणुकीचा मार्ग विचारला. तेव्हा नारदांनी आपली सुखदु:खात, भल्या बुऱ्यात साथ न सोडणारा अंतरीचा आत्माराम हा त्यास भेटवला. वाल्याच्या जीवनात ते परिवर्तन झाले आणि वाल्याचा राम नामाच्या जपाने वाल्मिकी ऋषी झाले. ते त्या एका वाटेकरी या शब्दाच्या अनुभव प्रचितीने.