संत, सत्पुरुष आणि सद्गुरू यांच्या शब्दांत एवढी ताकद असते की, त्यांचा साधा एकच शब्द हा भक्त, भाविक, शिष्य किंवा शरणांगताचे पार सारे जीवनच बदलून टाकतो. त्यांच्या एकाच शब्दाने त्या समोरच्या व्यक्तीत मोठे परिवर्तन घडते. तो सन्मार्गाला लागतो. वाल्याचा वाल्मिकी झाला तोही “तुझ्या पापाचे वाटेकरी व्हायला कोणी तयार आहेत का?’ या नारदांच्या एका शब्दाने? वाल्या आयुष्यभर त्याच्या कुटुंबाच्या सुखासाठी, त्यांच्या समाधानासाठी, त्यांच्याकरता वाटमारीसारखे कृत्य करत होता. त्यांना खायला, प्यायला घालत होता. त्यांचे संगोपन करीत होता. पण जेव्हा वाल्याने त्या आपल्याच लोकांना “माझ्या या कृत्याचा पापाचे कोण वाटेकरी व्हाल का?’ असे विचारले. त्या वेळी मात्र त्याच्या आपल्याच माणसांनी त्याच्याकडे पाठ फिरवली. त्याच्यापैकी कोणीच त्याच्या पापाचे किंवा त्या पापाबद्दल त्याला मिळणाऱ्या शिक्षेचे वाटेकरी व्हायला तयार झाले नाहीत. प्रत्येकाने सरळ कानावर हात ठेवले. वाल्या एकटा पडला.
आपल्या अवतीभोवती गोळा होणारी, आपली असे वाटणारी माणसं ही कसोटीच्या प्रसंगात, दु:खात, अपयशात, कष्टात वाटेकरी व्हायचं म्हटलं की चक्क पाठ फिरवतात. शिते जोवरी भुते तोवरी, हे आणि असं खऱ्या अर्थाने जीवाला जागे करण्याचे कार्यच ही मंडळी करत असतात. भोवतीच्या माणसांच्या गराड्यात गरजेच्या वेळी आपलं म्हणून पुढे येणारं, आपल्या दु:खात कसोटीच्या काळात आपत्तीच्या वेळी वाटेकरी कोणी होणार नाही. हे जेव्हा माणसाला अनुभवांती समजते, तेव्हा तो खऱ्या अर्थाने जागा होतो. खरा सोबती, सुखदु:खाचा वाटेकरी कोण आहे. आपल्या गालावरून ओघळणारे अश्रू कोण पुसणारा आहे? याचा विचार करू लागतो.
हीच शिकवण, हेच जीवन सत्य हरी पाटलाला समजावून सांगण्यासाठी, त्यास त्याची प्रत्ययानुभूती देण्यासाठी सिद्ध योगी श्री गजानन महाराजांनी ती मक्याची कणसं खाण्याची इच्छा बोलून दाखवली. शेतात कणसे भाजायला जाळ करताच मधमाशा उठल्या आणि सर्वांना डसू लागल्या. तेव्हा सारे जण प्रत्यक्ष गुरू गुरू म्हणणाऱ्या महाराजांनाही त्या मधमाशांच्या तावडीत टाकून दूर पळाले. ते जेव्हा त्या हरी पाटलाने पाहिले, अनुभवले तेव्हा त्यालाही वाटेकरी कोण हे नेमकेपणाने उमगले.
अरुण गोखले