चंदीगड – पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी पंजाबमध्ये सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षावर अंतर्गत कलहाचे ढग दाटून आले आहेत. राज्यात पक्ष नेतृत्वाने मुख्यमंत्री बदलण्याचा निर्णय घेतल्याने पायउतार व्हावे लागलेले अमरिंदर सिंग नाराज असून ते पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरु होत्या.
स्वतः अमरिंदर सिंग यांनी आज या चर्चांवर शिक्कामोर्तब केले आहे. बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर गुरुवारी अमरिंदर सिंग यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांना पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांवर भाष्य केले.
याबाबत बोलताना अमरिंदर सिंग म्हणाले, “आतापर्यंत मी काँग्रेसमध्ये आहे, पण मला ज्याप्रकरची वागणूक दिली जात आहे, ते पाहून मी काँग्रेसमध्ये राहणार नाही. ५० वर्षांनंतर माझ्या विश्वासार्हतेवर शंका घेतली जात असून ते असहनीय आहे,”
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्र्यांच्या भेटीनंतर अमरिंदर सिंग यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेत त्यांच्याकडे काही कागदपत्रे सुपूर्द केली. नेमकी ही कागदपत्रे कशाशी संबंधित होती याबाबतचा खुलासा अद्याप होऊ शकलेला नाही.
मुलाखतीमध्ये बोलताना अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब केले असले तरी त्यांनी भाजपात जाणार असल्याच्या चर्चा मात्र फेटाळून लावल्या आहेत. राज्यात अमरिंदर सिंग हे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर काँग्रेसने तेथे सामाजिक समीकरण साधण्याचा प्रयत्न करत दलित शीख चरणजित सिंग चन्नी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवली आहे.
राज्यात मागील बऱ्याच महिन्यांपासून सिद्धू – अमरिंदर सिंग असा वाद पाहायला मिळत होता. अखेर सिद्धू यांना पक्षामध्ये अमरिंदर सिंग यांच्याविरोधात वातावरण निर्माण करण्यात यश आल्याने अमरिंदर सिंग यांना खुर्ची सोडावी लागली. मात्र मुख्यमंत्रीपदाची महत्वकांक्षा बाळगणाऱ्या सिद्धू यांची वर्णी न लागल्याने त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.