पुणे – महाविकास आघाडीत आधीच धूसफूस सुरू असताना त्यात शनिवारी खासदार अमोल कोल्हे यांच्या वक्तव्याची भर पडली. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेनंतर आता शिवसेनेने प्रत्युत्तर दिलं आहे.
महाविकास आघाडीत तीन पक्ष एकत्र असताना बाह्यवळणाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांना डावलले गेलेच पण मलाही साधा फोन केला नाही. ज्यांनी मोठं केलं त्यांनाचा लक्ष केलं. कोल्हेंनी जेवढं स्क्रिप्ट दिलं तेवढंच वाचावं, अशा शब्दांत माजी खासदार आणि शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कोल्हेंवर टीका केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
खासदार कोल्हेंनी जाहीर कार्यक्रमात थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष केलं. त्यांनी स्वत:ची लायकी पाहून वक्तव्य करावं. हाच लबाड कोल्हा शिवसेनेतूनच मोठा झाला. आता त्याच शिवसेनेवर बोलायचे हा या माणसातील गुणधर्म आहे का ? असा सवाल आढळराव पाटील यांनी थेट कोल्हेंना विचारला.
खासदार असताना या महामार्गाच्या कामासाठी पाठपुरावा केला. मार्च २०१९ ला भूमीपूजन केलं. माझं श्रेय असताना मला डावललं गेलं. आता मी खासदार नाही, पण किमान फोन तरी करायला हवा होता. मुख्यमंत्र्यांचा फोटो जाहीरातीत वापरायला हवा होता. पुण्यात आघाडीत बिघाडी अमोल कोल्हे आणि दिलीप मोहिते हेच करत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला.
राजकारणात खालच्या पातळीवर जावून लोकांची दिशाभूत करण्यात येत आहे. मी म्हातारा असतो तरी माझ्याकडे बुद्धीमत्ता, समज आहे, यांच्यासारखा नटसम्राटासारखं नाही’ असं म्हणत पाटील यांनी कोल्हेंवर निशाणा साधला.