हैदराबाद –तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव (केसीआर) यांचा भ्रष्टाचारात देशात पहिला क्रमांक असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला. तेलंगणात भाजप सत्तेवर आल्यास केसीआर सरकारच्या भ्रष्ट व्यवहारांची चौकशी केली जाईल. भ्रष्टाचारात गुंतलेल्यांना तुरूंगात टाकले जाईल, असेही त्यांनी म्हटले.
विधानसभा निवडणुकीला सामोऱ्या जाणाऱ्या तेलंगणात शहा यांची सभा झाली. त्यावेळी त्यांनी भाजपचे प्रतिस्पर्धी असणाऱ्या पक्षांवर टीकेची झोड उठवली. घराणेशाहीचा संदर्भ देऊन त्यांनी भारत राष्ट्र समिती, एमआयएम आणि कॉंग्रेस या पक्षांचा उल्लेख अनुक्रमे 2जी, 3जी आणि 4जी म्हणून केला. 2जी म्हणजे केसीआर यांच्या दोन पिढ्या, 3जी म्हणजे एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांच्या तीन पिढ्या आणि 4जी म्हणजे गांधी परिवाराच्या चार पिढ्या, असे शहा म्हणाले.
भाजप हा घराणेशाहीवर आधारित पक्ष नाही. भाजप हा जनतेचा पक्ष आहे. घराणेशाहीशी संबंध नसलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची जगभरातील प्रतिष्ठा नव्या उंचीवर पोहचली आहे, असेही त्यांनी म्हटले. तेलंगणात प्रामुख्याने केसीआर यांच्या सत्तारूढ भारत राष्ट्र समितीची लढत कॉंग्रेसशी असल्याचे मानले जाते. मात्र, त्या राज्यात भाजपही पूर्ण ताकदीनिशी निवडणूक रिंगणात उतरला आहे.