नवी दिल्ली -पश्चिम बंगालमधील संदेशखाली प्रकरणावरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांच्या तृणमूल कॉंग्रेस सरकारला घेरण्याची रणनीती भाजपने अवलंबली आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्चच्या प्रारंभी बंगालचा दौरा करणार आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणूक विचारात घेऊन भाजपने ममतांच्या राज्यावर फोकस केल्याचे सूचित होत आहे.
बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील संदेशखालीत तृणमूलचा वादग्रस्त नेता शाहजहान शेख आणि त्याच्या समर्थकांनी अनेक महिलांवर अत्याचार केल्याचे आरोप होत आहेत. त्यावरून भाजपने आक्रमक होत ममता आणि त्यांच्या सरकारविरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे.
भाजपच्या टीकेमुळे सत्ताधारी तृणमूलला बचावात्मक पवित्रा स्वीकारावा लागत आहे. आता मोदींच्या दौऱ्याच्या माहिती पुढे आली आहे. ते १, २ आणि ६ मार्चला बंगालमधील विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. तसेच, सभाही घेणार आहेत. ते उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील महिला मेळाव्यात भाषण करणार आहेत. त्या मेळाव्यादरम्यान ते संदेशखालीतील महिलांच्या शिष्टमंडळाचे गाऱ्हाणे ऐकून घेणार असल्याचे समजते.
संदेशखाली प्रकरणावरून भाजप आणि तृणमूलमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगत आहे. तृणमूलने आपल्या नेते-कार्यकर्त्यांवर आरोप करण्यासाठी भाजपकडून महिलांना उद्युक्त केले जात असल्याचा प्रत्यारोप लावून धरला आहे.