नवी दिल्ली – संदेशखळीतील घटनांच्या संबंधात पश्चिम बंगाल विधानसभेत गदारोळ केल्याबद्दल विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्यासह भाजपच्या सहा आमदारांना पश्चिम बंगाल विधानसभेतून निलंबित करण्यात आले. ही कारवाई अधिवेशन कालावधी पुरती आहे.
अधिकारी यांच्या व्यतिरिक्त अग्निमित्र पाल, मिहिर गोस्वामी, बंकिम घोष, तापसी मंडल आणि शंकर घोष यांच्यावर निलंबानाची कारवाई करण्यात आली आहे. यामुळे कोलकात्त्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
प्रश्नोत्तराच्या तासाच्या सुरुवातीपासूनच, उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील संदेशखळी येथील घटनांच्या संबंधात भाजप आमदारांनी टीएमसी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.त्यातून मोठा गदारोळ माजला.
त्यानंतर सभापती बिमन बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसचे आमदार सोभनदेब चॅटर्जी यांना भाजप आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडण्यास परवानगी दिली.भाजप आमदारांना सभापतींनी निलंबित केले. हे निलंबन या अधिवेशनापुरतेच असल्याचे देखील समोर आले आहे.