नवी दिल्ली – केंद्र सरकारने पश्चिम बंगालचे अनेक योजनांचे पैसे थकवले आहेत. त्या पैशांच्या मागणीसाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( Mamata banarjee ) पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. आपल्याला १८ ते २० डिसेंबर या अवधीत भेटीसाठी वेळ द्यावा अशी मागणी त्यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवून केली आहे. स्वत: ममतांनी आज ही माहिती बागडोगरा विमानतळावर पत्रकारांशी बोलताना दिली. ( PM modi )
त्या म्हणाल्या की, मी या महिन्यात पक्षाच्या काही खासदारांसह दिल्लीला जाणार आहे आणि केंद्राकडे असलेल्या राज्याच्या थकबाकीसाठी पंतप्रधानांना भेटणार आहे. १८ ते २० डिसेंबर दरम्यान त्यांनी त्यांच्या सोयीची कोणतीही वेळ आम्हाला द्यावी असे आम्ही त्यांना कळवले आहे असे त्या म्हणाल्या. ( bjp vs tmc )
त्या म्हणाल्या की, केंद्र सरकार राज्याकडून जीएसटी गोळा करत आहे, परंतु त्यातून मिळणारे उत्पन्न मात्र राज्यांना दिले जात नाही. मनरेगा सारख्या विविध केंद्रीय योजनांतर्गत राज्यांना दिले जाणारे निधीही पश्चिम बंगालला मिळत नाहीत.
केंद्राकडून पश्चिम बंगालला आर्थिक देय रकमेपासून वंचित ठेवले जात आहे. विविध कल्याणकारी योजनांसाठी केंद्राने आपला निधी थांबवला असला, तरी राज्य सरकार स्वत:च्या पैशातून या योजना राबवत आहे असेही त्यांनी नमूद केले.