श्रीनगर – काश्मीरमधील अमरनाथ गुहेच्या मंदिराजवळ ढगफुटीमुळे अचानक आलेल्या पुरात मरण पावलेल्यांची संख्या 16 वर पोहोचली. तेथे अडकलेल्या 15 हजार यात्रेकरूंची सुटका करून त्यांना पंजतरणीच्या खालच्या बेस कॅम्पमध्ये हलवण्यात आले आहे. असे अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले.
शुक्रवारी दुपारी या परिसरात अचानक पूर आला आणि भूस्खलनाने तंबू आणि सामुदायिक स्वयंपाकघरे वाहून गेली. त्यामुळे लोकांचे प्रचंड हाल झाले. त्यांना अन्नपाणीही मिळणे मुश्किल होऊन बसले होते. अनेक लोक अजूनही बेपत्ता आहेत त्यांचा शोध जारी आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, 25 जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे, तर अनेक लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती आहे.
लष्कराच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, माउंटन रेस्क्यू टीम आणि लुकआउट गस्त पथके आणि स्निफर डॉग शोध आणि बचाव मोहिमेसाठी लावले गेले आहेत. शनिवारी सकाळी हवाई बचावकार्य सुरू झाले आणि लष्कराच्या हेलिकॉप्टरद्वारे सहा यात्रेकरूंना बाहेर काढण्यात आले. लष्करी वैद्यकीय पथके निलाग्रार हेलिपॅडवर रुग्ण आणि जखमींना पुढील मदत करीत आहेत. बीएसएफच्या एअर विंगचे एमआय- हेलिकॉप्टर सेवेत दाखल झाले आहे. जम्मू-काश्मीर प्रशासनाने बचाव कार्यासाठी प्रगत हलकी हेलिकॉप्टरही तैनात केली आहेत. आयटीबीपीची पथके यात्रा मार्ग पुन्हा सुरू ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे अतिरिक्त महासंचालक विजय कुमार, ज्यांच्याकडे काश्मीर रेंजचा कार्यभार आहे, ते सकाळी सुरक्षा दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या बचावकार्यावर देखरेख करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत. दहशतवादाच्या धमक्यांमुळे यावेळी प्रत्येक यात्रेकरूला रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन कार्ड देण्यात आले आहे.
अमेरिकेचा तालिबानला चर्चेस नकार, मागणीही धुडकावली…
30 जूनपासून सुरू झालेली वार्षिक तीर्थयात्रा या दुर्घटनेनंतर स्थगित करण्यात आली आहे आणि बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याने सांगितले. यात्रामार्गावर आता कोणताही यात्रेकरू उरलेला नाही. आतापर्यंत सुमारे 15,000 लोकांना सुरक्षितपणे हलवण्यात आले आहे.
‘वायएसआर’ कॉंग्रेस पक्षाच्या आजीवन अध्यक्षपदी जगनमोहन रेड्डी