कोटकपुरा – अमरिंदरसिंग कॉंग्रेसचे मुख्यमंत्री असताना ते भाजपच्या इशाऱ्यावर येथे राज्य करीत होते त्यामुळे त्यांना बदलावे लागले असा आरोप कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी त्यांचे नाव न घेता केला आहे. पक्षाच्या प्रचारार्थ त्यांनी आज कोटकपुरा येथे प्रचार सभा घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या की पंजाबात आमचे सरकार आहे. पुर्वी त्यात काही गडबड असल्याचे लक्षात आले. त्यावेळी हे सरकार दिल्लीतील भाजप नेत्यांच्या इशाऱ्यावर काम करीत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांना बदलावे लागले. आता येथे सामान्य वर्गातल्या चन्नींना आम्ही येथे आणले आहे. त्यामुळे नवीन पंजाबची येथे सुरूवात झाली आहे असे त्यांनी यावेळी नमूद केले.
पंजाबात कॉंग्रेसने कॅ. अमरिंदरसिंग यांना बदलून त्यांच्या जागी चरणजीतसिंग चन्नी यांना मुख्यमंत्री केले. त्या संबंधात प्रियंकांनी प्रथमच हे जाहीर भाष्य केले आहे. पंजाबी संस्कृतीशी आपला घनिष्ट संबंध असल्याचे नमूद करून प्रियंकांनी यावेळी सांगितले की, माझा विवाह पंजाबी परिवारात झाला आहे.
पंजाबी संस्कृतीशी आपला चांगला संबंध आहे. आणि त्याची मला चांगली समजही आहे असे त्यांनी यावेळी नमूद केले. येथील शेतकऱ्यांनी अत्यंत हाल सोसून दिल्लीच्या सीमेवर वर्षभर धरणे आंदोलन केले. त्यावेळी अनेकांचा मृत्यू झाला पण त्यांनी संघर्ष सोडला नाही. हीच खरी पंजाबियत आहे असे त्या म्हणाल्या.
आम आदमी पक्षावरही त्यांनी टीका केली त्या म्हणाल्या की दिल्ली मॉडेलच्या जाहींराती करून येथे एक पक्ष निवडणूक लढवत आहे. पण याचा अनुभव आपण मागे एकदा घेतला आहे; गुजरात मॉडेलची जाहीरात करून देशात एक पक्ष सत्तेवर आला आहे. त्याचे परिणाम आपण भोगले आहेत असाच प्रकार दिल्ली मॉडेलच्या जाहीराती करून सुरू आहे असा आरोपही त्यांनी केला.