एच. जे. नरवाडे
पुरुषप्रधान संस्कृतीत विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटित त्याचबरोबर एकट्या राहणाऱ्या अविवाहित महिला किती सुरक्षित आहेत? त्यांना दररोज कोणत्या समस्यांना समोरे जावे लागते याचा विचार करण्यास खरेतर कुणाकडे वेळच नाही. मात्र, त्यांच्याबाबत जाणून घेतल्यास आजचे विज्ञानयुग हे त्यांच्यासाठी अंधःकार युगच आहे.
आपल्या देशात किंबहुना जगातही महिलांचे प्रश्न उचलून धरणाऱ्या संस्था व संघटनांची कमतरता नाही. मात्र जुन्या काळापासून चालत आलेले महिलांचे अनेक प्रश्न आजही जसेच्या तसेच आहेत. विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटित महिलांना त्यांच्याच कुटुंबात व समाजात अवमानकारक वागणूक दिली जाते. अशा महिलांचे प्रमाण हे ग्रामीण भागत अधिक आहे. या महिलांकडे पोट भरण्यासाठी साधनसामग्री नसल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते तसेच या अडचणींवर उपायही त्यांच्याकडे नसतात. अशिक्षितपणा हासुद्धा या महिलांसाठी अभिशाप ठरतो. त्यांच्या एकाकीपणाचा आणि गरिबीचा फायदा उठवत त्यांना पायदळी तुडवले जाते.
पुरुषप्रधान संस्कृतीत एकट्या महिलेची स्थिती चिंताजनक आहे. अशा महिलांवर समाजाकडून अनेक बंधने लादले जातात. विधवा महिला सासरच्या माणसांवर आश्रित राहते. परितक्त्या आणि घटस्फोटित महिला अनेकवेळा माहेरातही दुसऱ्या दर्जाची नागरिक बनून राहते. दिवसभर घरात काम करूनही त्यांना उपेक्षितच ठेवले जाते. त्यांना कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य दिले जात नाही. आजही त्यांना एकटीने फिरण्यास मज्जाव केला जातो. त्यांना अनेक ठिकाणी उदा. सार्वजनिक मंदिरात प्रवेश करण्यास मज्जाव केला जातो. एवढेच नव्हे तर स्वतःच्या घरातील देवघरातही जाण्यास त्यांना बंदी असते. त्यांना कुठल्याही धार्मिक वा सामाजिक कार्यात मानसन्मान दिला जात नाही.
विधवांच्या समस्यांविषयी अनेक वेळा सकारात्मक दृष्टिकोन कुठे कुठे दिसतो. मात्र, परित्यक्त्या, घटस्फोटित एकट्या महिला आणि काही कारणास्तव अविवाहित राहणाऱ्या महिलांच्या समस्यांविषयी आपण फारसे जागरूक नसल्याचे दिसते. एकट्या राहणाऱ्या महिलांना आर्थिक शोषण, उपेक्षा, तिरस्कार, अनैतिक कामाशिवाय यौन शोषण अशा समस्यांचा सामना करावा लागतो. खेडेगावात अशा महिलांना आश्रय देणारा कुणी नसतो. शहरात तर अशा महिलांच्या अवतीभोवती अनेक कावळे टक लावून बसलेले असतात. अनेकवेळा असेही दिसते की या महिला आपल्या घरातही सुरक्षित नसतात. अशा महिलांविषयी घृणास्पद बोलले जाते. ती महिला निर्मळ असली तरी तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात. घर, परिसर आणि कामाच्या ठिकाणीही या महिलांकडे शरीरसुखाची मागणी केल्याची अनेक उदाहरणे वृत्तपत्रांत आणि बातम्यांमध्ये पाहायला मिळतात. अशा महिलांकडे केवळ उपभोगाची वस्तू म्हणून पाहिले जाते. त्यांनी याला विरोध केला तरी त्यांना वाली कोण?
2011 च्या जनगणनेनुसार अशा महिलांची संख्या पाच कोटी साठ लाखांच्या आसपास आहे. विशेष म्हणजे यात विधवा महिलांचे प्रमाण जास्त आहे. खेदाची बाब म्हणजे अशा महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
एक आणखी नवीन समस्या समोर येतेय ती म्हणजे कामानिमित्त किंवा नोकरीनिमित्त दुसऱ्या शहरात गेलेल्या माणसांच्या बायका घरी एकट्याच राहतात, या महिलाही एकट्या पडतात. त्यांच्या एकटेपणाचाही अनेकवेळा फायदा उचलला जातो.
आज सुशिक्षित म्हणवणाऱ्या समाजाची अशी हीन भावना आहे. आपण नेहमीच एकविसावे शतक, विज्ञानयुग, महिलांना समान अधिकार वगैरे मुद्द्यांवर समाज माध्यमांतून चर्चा करीत असतो. मात्र “कळते पण वळत नाही’ याप्रमाणे आपल्याच घरातील अशा महिलांना आपण किती स्वातंत्र्य दिले आहे याचा अवश्य विचार करावा. स्त्री म्हणजे केवळ उपभोगाची वस्तू आहे का, याचाही आज गांभीर्याने विचार करायला हवा. आजी, आई, पत्नी, बहीण, मुलगी, नात अशा विविध रूपात भेटणारी स्त्री समाजाच्या नजरेत कोणते स्थान टिकवून आहे याचाही विचार आपण करायला हवा.
याचीच दुसरी बाजू म्हणजे विधूर, घटस्फोटित पुरुषांना सर्व मोकळीक मिळते. त्यांच्यावर कसलेही बंधने घातले जात नाहीत. हा विरोधाभास समाजात ठळकपणे दिसतो.
अनेकवेळा असेही आढळले आहे की महिलांकडूनही पुरुषांचा छळ होतो, मात्र याचे प्रमाण नगण्य आहे. पुरुष असो वा महिला दोघेही न्यायाने समान आहेत. पुरुषांनी महिलांना व महिलांनी पुरुषांना आधार दिला तरच समाजात माणुसकी टिकून राहील.