मंत्रिपदानंतर धनंजय मुंडे पहिल्यांदाच नारायण गडावर
बीड : महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे पहिल्यांदाच बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. दौऱ्यात त्यांनी नारायण गडावर जाऊन महंतांचे आशीर्वाद घेतले.
आता गडावरुन कोणतेही राजकारण नाही, तर फक्त विकास होईल, असे धनंजय मुंडे यावेळी म्हणाले. सध्या माझ्याकडे बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी आहे. त्यामुळे गडाच्या विकासासाठी आता महंतांना कुठलीच मागणी करावी लागणार नाही.
जिल्ह्यातील गडांच्या विकासाची जबाबदारी आमची आहे, अशी ग्वाही धनंजय मुंडे यांनी दिली. यावेळी बीड जिल्हयातील राष्ट्रवादीचे सर्व आमदार उपस्थित होते.
आम्हाला कोणालाही वाटले नव्हते की मी मंत्री होईन. मात्र आता मंत्री झालो आहे. त्यामुळे सर्वाधिक विकास बीड जिल्ह्याचा करायचा आहे. मी आज नारायणगडावर आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे.
आशीर्वाद घेण्यापूर्वी रात्रीतून पालकमंत्रिपदाची घोषणाही झाली. आता कोणत्याही गडावरुन कसलंच राजकारण नाही, तर विकास होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गडावर जपून बोलले पाहिजे, दिलेला शब्द पाळला पाहिजे, असे सांगत “मी पुन्हा येईन’ मात्र आशीर्वादासाठी नव्हे तर दिलेला शब्द पाळण्यासाठी, असेही म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडे यांना टोला लगाविला.