येणारं सरकार युतीचच येणार
मुंबई: महाराष्ट्रात युतीचंच सरकार येणार, असे विधान करताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना-भाजप युतीवर शिक्कामोर्तब केले आहे. विशेष म्हणजे उद्धव यांच्या या विधानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. कलम 370 रद्द केल्याबद्दल मोदींचे कौतुक करताना उद्धव ठाकरेंनी राम मंदिर आणि समान नागरी कायदा मंजूर करण्याची आठवणही करून दिली. मुंबईत आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. मेट्रोच्या तीन मार्गिकांचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, रामदास आठवले आदी उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात करताना मोदीजी मला तुमचा अभिमान असल्याचे सांगत त्यांचे अभिनंदन केले. मोदीजी मी किती गोष्टींसाठी तुमचं अभिनंदन करु. गेली अनेक वर्षे ज्या गोष्टी आपण बोलत होतो त्या गोष्टी करुन दाखवल्या आहेत, असं सांगताना उद्धव ठाकरे यांनी कलम 370चा उल्लेख केला. काश्मीर अविभाज्य घटक होता, आहे आणि राहणार आणि हे नरेंद्र मोदींनी सिद्ध करुन दाखवलं, असल्याचंही यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितले.
नरेंद्र मोदींचे कौतुक करताना आमच्यामध्ये ताकद आहे, त्या ताकदीचा सदुपयोग करणारा आणि त्यासाठी मार्गदर्शन करणारा नेता आम्हाला सापडला आहे. देशाच्या अस्मितेचे विषय आपण सक्षमतेने हाताळत आहात. मोदींच्या रुपाने देशाला समर्थ नेतृत्त्व मिळाले आहे, असे ठाकरेंनी सांगितले. मोदीजींचा मला अभिमान वाटतो. ते अयोध्येत राम मंदिर देखील तुम्ही बांधाल हा विश्वास आहे, असे ते म्हणाले.
जे करायचं ते खुलेपणाने, दिलखुलासपणे करायचे आहे. आम्हाला सत्ता हवी आहे, पण सत्तेची हाव नाही. राज्याचा विकास करण्यासाठी सत्ता हवी आहे. राज्यात पुन्हा एकदा चांगलं आणि मजबूत सरकार आणायचे आहे. दरम्यान, आम्ही अनेक चांगल्या गोष्टी करतो आहोत, त्याला मोदींजींची चांगली साथ मिळत आहे, असेही ते म्हणाले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांचा लहान भाऊ असा उल्लेख केला. त्याला ठाकरे यांनी हसून दाद दिली.
पायाभूत सुविधांसाठी 100 लाख कोटी
येत्या पाच वर्षात पायाभूत सोयी आणि सुविधा यांच्यासाठी 100 लाख कोटी रुपये खर्च करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. आपला देश सध्याच्या घडीला 5 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करतो आहे. आता पुढील पाच वर्षात पायाभूत सोयी सुविधांवर 100 लाख कोटी रुपये खर्च करणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.