मुंबई – शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीमध्ये देखील दोन गट पडले आहेत. अजित पवार यांनी बंड करत शिंदे- फडणवीस सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यासारखे एकूण 9 नेत्यांनीही मंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर शरद पवार यांनी देखील पक्षसंघटना बांधणीसाठी राज्यात दौरा करणार असल्याचे सांगितले. त्यानुसार दुसऱ्याच दिवशी त्यांनी कराड येथे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी भेट दिली. यावेळी मोठ्या जल्लोषत त्यांचे साताऱ्यात स्वागत करण्यात आले.
परंतु आता शरद पवारांचे दौरे तूर्तास रद्द करण्यात आले आहे. हे दौरे पुढे ढकलण्यात आले आहेत. मात्र शरद पवार यांची उद्या येवल्यात सभा होणार आहे. या सभेनंतर उर्वरित दौरे पवार 8 दिवसांनी करणार आहेत. पावसाळी वातावरणामुळे पवारांनी हा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. उद्या येवल्यातील सभेनंतर पवार धुळे आणि जळगाव दौऱ्यावर जाणार होते. मात्र ते येवल्याहून ते मुंबईला परतणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बांधण्याची घोषणा केली असून त्यांची पहिली सभा छगन भुजबळांच्या येवल्यात होणार आहे. या सभेतून शरद पवार हे अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी केलेल्या आरोपावर सडेतोड उत्तर देण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र शरद पवार यांच्या दौऱ्याप्रकरणी अजित पवार यांनी थेट आव्हान दिले आहे. ‘तुम्ही जर प्रत्येक ठिकाणी जाऊन सभा घेणार असाल तर मलाही बोलता येते. माझेही लोक ऐकतात, जर तुम्ही काही बोलला तर मलाही बोलावे लागेल. जर नाही बोललो तर माझ्यात काहीतरी खोट आहे असं लोकांना वाटेल. त्यामुळे तुमच्या सभा होतील तिथे ७ दिवसांनी मलाही सभा घेऊन लोकांना उत्तर द्यावे लागेल,’ असं आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले होते.