भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख फलंदाज व आयपीएल स्पर्धेत सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज अशी ख्याती असलेल्या विराट कोहलीला आता एक अर्धशतकही साकार करता येत नसल्याने त्याच्यासह सर्व चाहतेही निराश झाले आहेत. जागतिक क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरचा वारसदार अशी ओळख काही वर्षांतच त्याने तयार केली. मात्र, आता 2019 सालापासून त्याचे शतक तर सोडाच पण एक मोठी खेळीही झालेली नाही. तो भरात कधी येणार हा आता राष्ट्रीय प्रश्न बनला आहे.
लहानपणापासून चिकू या टोपण नावाने प्रसिद्ध असलेला हा अलौकिक प्रतिभा असलेला खेळाडू धावांसाठी झगडताना पाहून वेदना होतात. सचिनच्या पावलावर पाऊल ठेवत एकेकाळी शतकांची रास ओतणारा आज मात्र, एका अर्धशतकासाठीही आसुसलेला आहे. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत त्याने आतापर्यंत जितके सामने खेळले आहेत, त्यात मिळून एकूण धावांची साठीही त्याने गाठलेली नाही.
इतकी अपयशी मालिका त्याने त्याच्या आजवरच्या कारकिर्दीत कधीही पाहिली नव्हती. मग त्याचे कुठे चुकत आहे, त्याने काय केले पाहिजे, त्याने कसा शॉट मारावा असे सल्ले घरात बसून देणारे गृहप्रशिक्षक व आपल्याला क्रिकेटमधले सगळे कळते हे सातत्याने दाखवणारे सल्लागार अनेक दिसून येतात.
मात्र, ज्यांना खरेच यातले कळते ते सचिन किंवा विक्रमादित्य सुनील गावसकरांसारखे खेळाडू स्वतःहून त्याला सल्ला देत नाहीत याचेही आश्चर्य वाटतो. पूर्वी भारतीय क्रिकेट संघ कुटुंबाप्रमाणे होता. निवृत्त झालेले किंवा संघात असलेले वरिष्ठ खेळाडू आपल्या सहकारी खेळाडूच्या चुका दुरुस्त करत होते, तसेच त्याला नेटमध्ये सराव करताना मौलिक सल्लेही देत होते. आज मात्र व्यावसायिकतेच्या नावाखाली समोरचा अपयशी कसा होईल हेच पाहिले जाते.
कोहलीचा तापट स्वभावही या स्थितीला कारणीभूत असावा पण तरीही त्याचा हा अपयशी कालखंड ज्याला क्रिकेटच्या परिभाषेत बॅडपॅच म्हणतात तो दूर व्हावा व त्याचे थाटात शतकी पुनरागमन व्हावे ही तमाम कोहलीप्रेमींचीच नव्हे तर जागतिक चाहत्यांचीही अपेक्षा आहे.
परवा मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात तो 48 धावांवर पायचित झाला. खरेतर त्याचा आत्मविश्वास खालावला आहे, हे त्याच्या देहबोलीतूनच स्पष्ट दिसत आहे. त्याचे पाय चेंडूवर येत नाहीत, त्याचे डोके स्थिर नसते. ऑनला फटके मारताना तो जरा जास्तच ऑफ स्टम्प कव्हर करत आहे. बॅकफूट पंचही त्याचे बसत नाहीत. या तंत्रातील चुका आहेत गुणवत्तेतील नव्हे. त्यामुळे सचिनने पुण्यातील सामन्यानंतर त्याला दिलेल्या टिप्स यशस्वी होतील का, हे पाहणे उत्सुकतेचे बनले आहे.
एक मोठी खेळी तुमचा हरवलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवून देतो हे सचिनच्या बाबतीत 1997-98 साली आपण पाहिले. आता प्रतीक्षा आहे ती कोहलीच्या एका मोठ्या खेळीची. कारण जर ही खेळी साकार झाली तर सचिनच्या विक्रमांना मागे टाकायला त्याला वेळ लागणार नाही. लॉ ऑफ ऍव्हरेजेसचा कोहलीचा कालखंड लवकर संपुष्टात यावा व यंदाच्या स्पर्धेत किंग कोहलीचे थाटात पुनरागमन व्हावे हीच अपेक्षा आहे.