आंबेगाव तालुक्यात वैद्यकीय सेवा वगळता सर्व जीवनावशक्य दुकाने बंद
तळेघर- करोनाचा वाढत चाललेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाचे युद्ध पातळीवर प्रयत्न चालू आहेत. यालाच हातभार म्हणून आंबेगाव तालुकयातील पश्चिम आदिवासी भागातील बांधवांनीही आपले गाव पाच दिवस पूर्णपणे बंद ठेऊन या लढाईत आपला सहभाग नोंदवला आहे.
कोरोना विषाणूचे गांभीर्य लक्षात घेता आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील तळेघर, जांभोरी, चिखली, फलोदे, भीमाशंकर, तेरुंगण, निगडाळे, राजपूर, राजेवाडी आदी गावांनी 1 ते 5 एप्रिलपर्यंत कडकडीत बंद पाळला आहे.
या बंदमध्ये दवाखाने वगळता सर्व किराणा व्यवसायिक, भाजीपाला दुकाने, दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री करणारे केंद्र,आदी सर्व व्यवहार बंद ठेवले आहेत. या बंदच्या काळात विनाकारण बाहेर फिरणाऱ्या लोकांकडून ग्रामपंचायत दंड वसूल करीत आहे. गावात सगळीकडे शुकशुकाट आहे. गावातील लोकही घरीच राहणे पसंत करीत असून आपल्या आरोग्याची काळजी घेत आहेत.