प्रसाद शेटे
मेढा – अवैध धंदे करणाऱ्याला दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद कायद्यात असली तरी जावळीत अवैधरित्या दारू विक्रीप्रकरणी गेल्या दहा-बारा वर्षांत पोलिसांनी असंख्य कारवाया केल्या. मात्र, एकाही प्रकरणात दारू विक्रेत्यावर कधी दहा दिवस तुरुंगात बसण्याची वेळ आली नाही. अतिवृष्टी व नंतरच्या अवकाळी पावसाने जावळी तालुक्यात ओला दुष्काळ आहे, त्याचप्रमाणे दारूचाही ओला दुष्काळ आहे.
गेल्या दहा-बारा वर्षांत जावळी तालुक्यातील अनेक गावांमध्ये महिलांच्या उठावामुळे “बाटली आडवी’ झाली. देशी दारूची अनेक दुकाने महिलांनी विशेष ग्रामसभांमध्ये मतदानाद्वारे बंद केली. त्यांना व्यसनमुक्ती संघटनेचे बळ लाभले. त्यातून तालुक्याची ओळख राज्यात निर्माण झाली. मात्र, आता अवैध दारूचा महापूर गावागावात वाहत आहे. तालुक्यातील मुख्य गावांमधील काही भामटे अवैध दारूचे सम्राट झाले असून अनेकांनी करोडोची माया कमावली आहे. अवैध दारू कधीच बंद झाली नाही. अवैध दारू विक्रेत्यांवर जुजबी कारावाया झाल्याने किरकोळ दंड भरून ते नेहमीच सुटत आले आहेत. महिलांच्या लढ्याला आज महत्त्व नाही. उत्पादन शुल्क विभागाने कारवाया केल्या तरी अवैध दारू विक्री आजपर्यंत बंद झालेली नाही.
तोल जाऊन पडल्याने युवक जखमी
सातारा, दि. 18 (प्रतिनिधी) -चालत जात असताना तोल जाऊन पडल्याने संदीप संजय पवार (वय 25, रा. मतकर कॉलनी, सातारा) हे जखमी झाल्याची घटना घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संदीप पवार हे रविवारी सायंकाळी 7.30 च्या सुमारास मोती चौकातून चालत जात असताना तोल जाऊन पडले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला मार लागला. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
युवकाने केले विषारी औषध प्राशन
सातारा, दि. 18 (प्रतिनिधी) -किशोर हणमंत शिंदे (वय 30, रा. गजवडी, ता. सातारा) यांनी घरगुती कारणावरून रविवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.