कार्तिक वारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा निर्णय : पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे पोलिसांचे आवाहन
आळंदी- कार्तिकी वारीसाठी मंगळवार (दि. 19) पासून आळंदीला औद्योगिक भागातून येणारी अवजड आणि चारचाकी वाहतूक पूर्णपणे बंद राहिल. मरकळ औद्योगिक भागात जाणारी अवजड वाहतूक पुणे आळंदीमार्गे न नेता पुणे-नगर महामार्गावरून वाघोली लोणीकंदमार्गे वळविली जाईल. तर चाकण, भोसरी, चिंबळी, शेलपिंपळगाव भागातून येणारी अवजड वाहनांना आळंदीकडे मार्ग बंद राहिल. वारी काळात शहरातील धर्मशाळांपुढे रस्त्यावर वाहने उभे करण्यास बंदी राहणार असल्याची माहिती आळंदी पोलीस ठाण्याचे निरिक्षक रवींद्र चौधर यांनी दिली.
रवींद्र चौधर म्हणाले की, घातपात अथवा चेंगराचेंगरीसारख्या दुर्घटना टाळण्यासाठी येणाऱ्या भाविकांमधील संशयास्पद व्यक्तींवर पोलिसांची विषेष नजर असणार आहे. अनेक ठिकाणी वाहनांची तपासणी केली जाणार आहे. संपूर्ण पोलिसांची दहा गटात विभागणी केली जाणार असून दोन सत्रात बंदोबस्त राहिल. इंद्रायणी नदी परिसर, प्रदक्षिणा मार्ग, गोपाळपूरा, चाकण चौकातील भुरट्या चोऱ्या आणि पाकिटमारीवर लक्ष ठेवण्यासाठी साध्या वेशातील पोलीस तैनात करण्यात येणार आहे. मंदिराच्या पानदरवाजातून भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येईल. दर्शन झाल्यानंतर भाविकांनी महाद्वारातून बाहेर पडण्यासाठी मार्ग आहे. महाद्वारातून केवळ पोलीस, महसूल कर्मचारी, देवस्थानचे मानकरी, पुजारी, पत्रकार अशा फोटोपासधारकांनाच प्रवेश दिला जाईल. हरिहरेंद्र स्वामी मठाशेजारील दरवाजातून फडकरी, दिंडीकरी आणि निमंत्रित पासधारकांना प्रवेश दिला जाईल. हनुमान दरवाजातून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना प्रवेश दिला जाणार आहे.
अवजड वाहने तसेच ट्रकसारख्या चारचाकी वाहनांसाठी शहराच्या बाहेर पार्किंगची सुविधा केली आहे. हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पब्लीक ऍड्रेस सिस्टम आहे. एकाच ठिकाणी गर्दी होवू नये यासाठी शहरात सहा ठिकाणी सिसीटीव्ही उभारले जातील. अत्यावश्यक सुविधा पुरविणारी रूग्णवाहिका, दूधविक्रेते यांना शहरात प्रवेश राहिल. यात्रा काळात अवैध धंद्यावर कारवाई केली जाईल. यात्रा काळात परमिटची मद्यविक्रीही बंद ठेवली जाणार आहे. सोमवार (दि. 18)पर्यंत पोलिस बंदोबस्त रूजू झाल्यावर रंगीत तालीम केली जाणार आहे.
- या फौजफाट्याची केली मागणी
शहरात यंदाच्या वर्षी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात येणार आहे. यामधे सात सहायक आयुक्त, 30 निरिक्षक, 132 सहायक निरिक्षक आणि उपनिरिक्षक, एक हजार पुरूष आणि 250 महिला पोलीस, 450 होमगार्डस असा फौजफाटा कार्तिकी वारीसाठी वरिष्ठांकडे मागणी केली. मंदिर आणि मंदिर परिसरात 100 पोलिसांचा बंदोबस्त तर महाद्वार, सभामंडपात महिला पोलिसांची नेमणूक केली जाणार आहे. तर 200 वाहतूक पोलिसांची नेमणूक केलेली आहे. - 125 सीसीटीव्हींची राहणार नजर
इंद्रायणीकाठी आणि शहरातील प्रमुख चौकात संशयास्पद हालचाली टिपण्यासाठी स्वतंत्र पोलिसांची नेमणूक केली जाईल. शहरात सिसीटीव्ही यंत्रणेसाठी 125 सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील. - ठळक घडामोडी
नदीकाठी तसेच प्रदक्षिणा मार्गावर छेडछाड रोखण्यासाठी महिला बिट मार्शल
प्रदक्षिणा रस्ता आणि मंदिराकडे येणाऱ्या मार्गावर वाहनांना बंदी
शहराबाहेर चारचाकी वाहनांसाठी पार्किंग
हनुमान दरवाजातून व्हिआयपींना प्रवेश
महाद्वारातून फोटोपासधारकांना प्रवेश
शहरात प्रमुख रस्त्यांवर सीसीटीव्हीची नजर
अवैध दारूर मटका, लॉजचे व्यवसाय बंद
अतिक्रमण कारवाईसाठी स्वतंत्र पोलीस पथक