आळंदी – पत्रकारांच्या मागण्यांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याने करोनामुळे पत्रकारांचा मृत्यू होण्याच्या घटना वाढत आहेत. सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आज (दि.1) ज्येष्ठ पत्रकार एस.एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील पत्रकारांनी आत्मक्लेश आंदोलन केले. आळंदीतील पत्रकारांनी देखील घरीच श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण करून या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.
ज्येष्ठ पत्रकार एम.डी. पाखरे, विलास काटे, अर्जुन मेदनकर, हमीद शेख, दिनेश कुऱ्हाडे, ज्ञानेश्वर फड, श्रीकांत बोरावके, सुनील बटवाल, अनिल जोगदंड, विठ्ठल शिंदे, गायत्री ढवळे, दादासाहेब करांडे, संदीप शिंदे, हनुमंत घोंगडे, भावना शिंदे यांनी या आंदोलनात सहभागी होत पाठिंबा दर्शवला. तसेच आळंदीतील समस्या सोडविणे आणि विकासकामांसाठीचा ग्रुप ‘आळंदी विकास युवा मंच’ यांनीही पाठिंबा दर्शवला.
करोनामुळे पत्रकारांच्या बळींचा आकडा शंभरी पार गेला आहे. या महिन्यात करोनामुळे मृत्यूमुखी पडलेले अनेकजण 35 ते 50 वयोगटातील आहेत. मराठी पत्रकार परिषदेने केलेल्या मागणीनुसार वेळीच सर्व पत्रकारांना लस दिली असती तर अनेकांचे प्राण वाचू शकले असते.
पत्रकारांच्या मागण्या –
– पत्रकारांचे फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून लसीकरण व्हावे
– कोरोना काळात पत्रकारांना २ लाख रूपये पर्यंत मेडिक्लेम पॅालिसी
– पत्रकार व त्यांच्या कुटूंबीयांसाठी प्रत्येक रूग्णालयात राखीव बेड
– कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना 10 लाख रूपये मदत