आळंदी – आळंदी देवस्थानच्या विश्वस्तपदी स्थानिकांना डावलल्याप्रकरणी तीर्थक्षेत्र आळंदी येथे मंगळवारी (दि.5) सकाळी ग्रामस्थांनी दुपारपर्यंत बंद पाळला. विरोध करत असताना धार्मिक कार्यक्रमात कोणतीही अडचण येणार नाही, याची ग्रामस्थांनी पूर्ण काळजी घेतली.
ग्रामस्थ पायरीपूजनाला देखील उपस्थित राहिले, त्यानंतर चाकण चौक येथून प्रदक्षिणामार्गे निषेध मोर्चा काढून माऊली महाद्वारात समारोप सभा घेतली. यावेळी मोर्चादरम्यान, स्थानिकांना डावलल्याने आणि प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. दरम्यान, प्रदक्षिणा मार्गासह परिसरातील दुकानदारांनी उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेऊन मोर्चाला पाठिंबा दर्शवला. या मोर्चात आळंदीकर ग्रामस्थ तसेच आळंदी येथील वारकरी सांप्रदायातील मंडळीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्तिक वद्य अष्टमी निमित्ताने सकाळी नऊ वाजता श्रीगुरु हैबतबाबा पायरी पुजन सोहळा मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला. यामध्ये आळंदीकर ग्रामस्थदेखील सहभागी झाले होते. या धार्मिक सोहळ्यानंतर आळंदीकर ग्रामस्थांनी बंद पुकारला. विकास ढगे, योगेश देसाई व लक्ष्मीकांत देशमुख या तीन विश्वस्तांना मार्च महिन्यापर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. तर आळंदीकर ग्रामस्थ तसेच वारकरी संप्रदायातील कीर्तनकार मंडळींना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आळंदीकर आक्रमक झाले आहेत. दरम्यान, आज आळंदीतील सर्व दैनंदिन व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या होत्या.
चाकण चौकातून सुरू झालेल्या निषेध मोर्चाचे महाद्वारासमोर सभेत रुपांतर झाले. नवीन विश्वस्त निवड व योगेश देसाई यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा या सभेत निषेध नोंदविण्यात आला. आज (दि. 5) संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकीवारी सोहळ्याला सुरुवात झाली आहे.
भाविकांची गैरसोय होणार नाही याची काळजी
दुपारनंतर ‘आळंदी बंद’ शिथिल करण्यात आला. त्यानंतर आळंदीतील दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरु झाले. भगवान श्री पांडुरंग, संत नामदेव महाराज, भक्त पुंडलिक यांच्या पालख्यांचे आज आळंदीत आगमन झाले. त्यामुळे येणार्या भाविकांची आळंदीत गैरसोय होणार नाही, याची काळजी आळंदीकरांनी घेतली असल्याची माहिती यासभेत आयोजकांनी दिली.