लखनौ – माध्यमांमध्ये सध्या ज्ञानवापी मशीद सर्वेक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजताना दिसतोय. सर्वेक्षणासाठी नेमलेली समिती सर्वेक्षणाबाबतचा अहवाल सर्वोच्च न्यायालयापुढे मांडणार असून यानंतर न्यायालय याबाबतचा निर्णय देणार आहे. मात्र न्यायालयाच्या निर्णयापूर्वीच समाज माध्यमांवर दोन्ही बाजूंकडून दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. मुस्लिम शासकांनी उभारलेल्या वास्तूंवरून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. या वास्तू मुळात हिंदूंच्या असून मुस्लिम शासकांनी त्या बळकावल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे. अशातच आता समाजवादी पक्षाचे नेते अखिलेष यादव यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे.
“भाजप ताजमहल, ज्ञानवापी मशीद या मुद्द्यांचा वापर करून बेरोजगारी, महागाई अशा मूलभूत प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी करत आहे. यामुळे या मुद्द्यांकडे दुर्लक्ष होईल व चर्चा होणार नाही असं भाजपला वाटत. भाजपचे धोरण सध्या एक देश, एक व्यावसायिक असल्याचं दिसतंय.” असा टोला अखिलेश यादव यांनी लगावला.
मुस्लिम धर्मियांना आक्षेप नोंदवण्यास दोन दिवसांची मुदत
दरम्यान वाराणसी न्यायालयाने आज ज्ञानवापी मशिदीबाबत मुस्लिम धर्मियांचे आक्षेप नोंदवण्यास दोन दिवसांची मुदत दिली आहे. यापूर्वी न्यायालयाने एक दिवसाची मुदत दिली होती, मात्र मुस्लिम धर्मियांकडून दोन दिवसांची मुदत मागण्यात आली. न्यायालयाने याबाबत सकारात्मक निर्णय देत ही मागणी मंजूर केली.
सर्वेक्षणादरम्यान शिवलिंग सापडल्याचा दावा
ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण सुरु असताना मशिदीमध्ये शिवलिंग सापडल्याचा दावा करण्यात आलाय. याबाबत काही व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.