लखनौ – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा 7 मार्चला संपला. मतदान संपताच सर्व यंत्रणांकडून एक्झिट पोल जारी करण्यात आले आहेत. ज्यामध्ये भाजपचे पुनरागमन दिसून येत आहे. त्याच वेळी, एक्झिट पोलचे दावे फेटाळून लावत समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आम्हीच सरकार बनवणार असल्याचं म्हटलं आहे.
अखिलेश यादव यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “सातव्या आणि निर्णायक टप्प्यात सपा-आघाडीचा विजय बहुमताच्या खूप पुढे नेल्याबद्दल सर्व मतदारांचे आणि विशेषत: तरुणांचे खूप खूप आभार! आम्ही सरकार बनवत आहोत!”
एबीपी सी व्होटर, अॅक्सिस माय इंडिया आणि टुडेज चाणक्यचे एक्झिट पोल भाजपला बहुमत मिळाल्याचे दाखवत असताना, असा एक एक्झिट पोल आहे. ज्यामध्ये समाजवादी पक्ष सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे. खरं तर, इंडिया टीव्ही ग्राउंड झिरो पोलमध्ये भाजप 188 ते 220 जागा जिंकताना दिसत आहे.
याच पोलनुसार सपा 168 ते 208 जागा जिंकू शकते. या पोलमध्ये बसपाला 2 ते 12, काँग्रेसला 2 ते 8 आणि इतरांना 2 ते 4 जागा मिळू शकतात. दुसरीकडे, सपाच्या सरकार स्थापनेच्या शक्यतेबाबत ग्राउंड झिरो म्हणते की जर भाजपची स्थिती बिघडली आणि भाजप 180 जागांपर्यंतच पोहोचलं तर सपा आणि त्यांचे सहयोगी पक्ष 208 जागांसह सरकार स्थापन करू शकतात. याशिवाय दुपारी ४ च्या सर्वेक्षणात सपा सरकार स्थापन करू शकतं असा दावाही केला जात आहे.