मुंबई – टीव्ही जगतात जर एखादा कॉमेडी शो असेल जो लोक खूप दिवसांपासून पाहत असतील तो शो म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. या शोचे चाहते जगभरात आहेत. इतकेच नाही तर या शोमधील कलाकारांना लोक खूप प्रेम देतात. मात्र, काही महिन्यांपूर्वीच या मालिकेतील एका महत्वाच्या अभिनेत्यानं 14 वर्षांनंतर या मालिकेचा निरोप घेतला आहे. आणि ते नाव म्हणजेच, अभिनेता ‘शैलेश लोढा’ या मालिकेत शैलेश यांनी ‘तारक मेहता’ हे पात्र साकारलं होत. मात्र, आता त्यांची जागा अभिनेता ‘सचिन श्रॉफ’ याने भरून काढली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी एक चर्चा होती की, शैलेश लोढा यांचे मानधन निर्मात्यांकडून देण्यात आले नाही आणि त्यांनी मालिका सोडून दिली. मात्र, यावर बोलताना असित मोदी म्हणाले होते की, ‘मी कधीही कोणाचेही पैसे ठेऊन घेत नाही’. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.
मात्र, यावर आता शैलेश लोढा यांनी नाव न घेता मोठे भाष्य केले आहे. “जे सोडून टाकले त्यावर काय बोलायचे? पण हा सध्या राष्ट्रीय प्रश्न तयार झालाय…पुस्तक प्रकाशित करणारे देशातील प्रकाशक हिऱ्याच्या अंगठ्या घालून फिरतात आणि लेखकाला स्वतःचे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी पैसे द्यावे लागतात…
दुसऱ्यांच्या कलागुणांवरून कमावणारे उद्योगपती जर स्वत:ला हुशार आणि मोठे समजू लागले तर मग कोणीतरी प्रतिभावान व्यक्तीने उभे राहून आवाज उठवावा लागतो की, मी त्यापैकी आहे, ज्याने हा आवाज उठवला आहे.’ असं ते म्हणाले. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेच्या मुलाखतीत ते बोलत होते.