– महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आज मुंबईतील बीकेसी मैदानावर होणार आहे. छत्रपती संभाजी नगर, नागपूर येथे झालेल्या सभांनंतर ही तिसरी वज्रमूठ सभा असणार आहे. दरम्यान, नागपूर येथे झालेल्या वज्रमूठ सभेत विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी भाषण केले न्हवते. त्यावेळी अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे अजित पवार नागपूरच्या सभेला उपस्थित राहणार का असाही प्रश्न चर्चिला गेला. मात्र अजित पवार यांनी सभेला उपस्थिती लावत या चर्चांना फोल ठरवलं होत. मात्र मंचावर उपस्थित असूनही अजित पवार यांनी भाषण न केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अशातच मुंबईच्या सभेत अजित पवार बोलणार का असा प्रश्न उपस्थित केला जात होता. या प्रश्नाला आता उत्तर मिळाले आहे.
अजित पवार मुंबईतील वज्रमूठ सभेसाठी मुंबईत दाखल झाले असून त्यांनी सभास्थळाकडे जाण्यापूर्वी महाराष्ट्रदिनाच्या निमित्ताने हुतात्म्यांच्या स्मारकास अभिवादन केले. यानंतर अजित पवार हे सभास्थळी दाखल झाले आहेत. अजित पवार यांच्या व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्य नेते देखील सभास्थळी दाखल झाले आहेत.
अजित पवार भाषण करणार का?
या सभेमध्ये अजित पवार भाषण करणार का हा प्रश्न चर्चिला जात असतानाच संजय राऊत यांनी या प्रश्नाला उत्तर दिले आहे. माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी, विरोधीपक्ष नेते अजित पवार मुंकबीतील बीकेसी मैदानावर होत असलेल्या वज्रमूठ सभेत बोलणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्रीपदावरून महाविकास आघाडीत बिघाडी?
दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून बिघाडी झाल्याची चर्चा आहे. अजित पवार यांच्या समर्थकांनी भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनरबाजी केली होती. यानंतर जयंत पाटील यांनी देखील भावी मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल असं म्हंटल होत. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, ज्याचे जास्त संख्याबळ त्याचा मुख्यमंत्री असा फॉर्म्युला सांगितलं होता. आजच्या सभेत मुख्यमंत्रीपदाबाबत काय स्टॅन्ड घेतला जातो हे पहावं लागणार आहे.
सर्वांना समान खुर्च्या?
छत्रपती संभाजी नगर येथे झालेल्या पहिल्या वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरे यांना इतर नेत्यांपेक्षा वेगळी खुर्ची देण्यात आली होती. यामुळे राष्ट्रवादी व काँग्रेस नेते नाराज झाल्याचं बोललं गेलं. ही चूक नागपूर येथे झालेल्या सभेत सुधारण्यात आली होती. नागपूरच्या सभेत सर्वांना सामान खुर्च्या देण्यात आल्या होत्या. आता मुंबईतील सभेमध्ये समान खुर्च्या पाहायला मिळतात का याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.