मुंबई – राज्यसभेत मंगळवारी काश्मीरमधील कॉंग्रेस नेते गुलामनबी आझाद यांच्यासह एकूण चार राज्यसभा सदस्यांना निरोप देण्यात आला. यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी राज्यसभेत झालेल्या कामकाजाच्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुलामनबी आझाद यांच्यावर बोलताना अश्रु अनावर झाले. त्यामुळे सारे सभागृह भावूक झाल्याचे दिसून आले. मोदींच्या भावूक झालेल्या प्रसंगावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खोचक टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात भावूक झाल्याचं दिसून आलं होत. त्यानंतर, सोशल मीडियात हा व्हिडिओ व्हायरल झाला, त्यावरुन अनेकांनी मिम्सही बनवले. आता, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोदींच्या भावूक होण्यावरुन त्यांना टोला लगावला. अजित पवार यांनी शेतकरी आंदोलनाचा मुद्दा धरुन मोदींना चिमटा काढला आहे. “पंतप्रधान राज्यसभेत गुलाम नबी आझादांच्या आठवणी सांगताना भावूक झाले, असेच ते शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर भावूक झाले तर आनंद होईल, असं ते म्हणाले.
मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना ते जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होते. 2007 साली जम्मू काश्मीरात झालेल्या दहशतवादी हल्ल्याची माहिती प्रथम त्यांनी मला दिली होंती. त्यावेळी आझाद यांना अश्रु अनावर झाले होते. दहशतवादी हल्ल्यामुळे काही गुजराती माणसे काश्मीरात अडकली होती. त्यांच्या सुटकेसाठी गुलामनबी आझाद आणि प्रणव मुखर्जी यांनी केलेली मदत मी विसरू शकत नाही. या माणसांविषयी त्यांनी ज्या भाषेत आपुलकी दाखवली ती आपल्याच कुटुंबातील माणसांविषयी असलेल्या आपुलकीप्रमाणे होती असे ते म्हणाले. सत्ता येईल आणि जाईल पण ती कशी हाताळायची याचे उत्तम उदाहरण त्यांनी दाखवून दिले आहे असे ते म्हणाले होते. यावेळी ते भावूक झाले होते.