मुंबई – राज्यात करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन होणार अशी शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे मुंबईत आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या बैठकीत लॉकडाऊन होणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे. मात्र काही निर्बंध लावण्यात आले आहे. तर विकेंडमध्ये लॉकडाऊन असणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लॉकडाऊन लावण्यासंदर्भात आणि लावण्यापूर्वी नागरिकांची काळजी घेतली जाईल, असं म्हटलं आहे.
अजित पवार म्हणाले, आताच्या करोनाबाधित रुग्णाला आधीसारखा त्रास जाणवत नाहीये. खासगी आणि सरकारी रुग्णालयात बेड कमी पडू न देण्याची काळजी घेत आहोत. ऑक्सिजनचीही कमतरता भासणार नाही. याकडे आमचे लक्ष आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून १५ एप्रिलपर्यंतच्या परिस्थितीचे निरीक्षण केले जाईल.
दरम्यान लॉकडाऊन लावायचा असेल तर दोन दिवस अगोदर नागरिकांना सांगितले जाईल, असे अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. कठोर निर्बंध करण्याचा निर्णय घेण्याअगोदर मुख्यमंत्री यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती. त्यामुळे यामध्ये कोणीही राजकारण आणू नये अशी विनंतीही पवार यांनी केली.