नाशिक – गेल्या नऊ वर्षांपासून देशात पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार आहे. अनेक कामे होत आहेत, अनेक प्रकल्प राज्यात आले आहेत. नरेंद्र मोदी यांचा करिष्मा आहे, तो नाकारता येणार नाही. वंदे भारत एक्सप्रेसने येत असताना अनेक लोकांशी चर्चा केली. रेल्वेत अनेक लोक साई दर्शनासाठी जात होते. त्यांनी सांगितलं की, वंदे भारत रेल्वेची सर्व्हिस चांगली आहे. अशा सुविधा लोकांना दिल्या पाहिजे, लोकांच्या मूलभूत गरजा लोकांपर्यंत पोहचविल्या पाहिजे. त्यामुळे देशातच नव्हे जगभरात नरेंद्र मोदींचा करिष्मा असून नरेंद्र मोदींसारखं दुसरं नेतृत्व नसल्याचे सांगत केंद्र सरकारकडून अधिक मदत मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे अजित पवार म्हणाले.
आज नाशिक शहरात शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होता. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिकमध्ये आले होते. सकाळी वंदे भारत एक्सप्रेसच्या मध्यमातून ते नाशिकमध्ये दाखल झाले. यानंतर जोरदार शक्ती प्रदर्शन हे करण्यात आले. त्यांनतर शासकीय विश्रामगृहात अजित यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
दरम्यान यावेळी अजित पवार यांनी सांगितले की, राज्यात पावसाचे अत्यल्प प्रमाण आहे. पेरण्या नगण्य झाल्या आहेत. काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट आहे. मख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी आम्ही तिघे आढाव घेत आहोत. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहे. राज्याचा विकासासाठी आम्ही सरकारमध्ये सामील झालो असून आम्ही परिवार म्हणून काम करत आहोत. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारशी समन्वय साधून राज्यातील प्रश्न सोडविता येणार आहेत, असेही पवार यांनी सांगितले.
पुढे बोलताना पवार म्हणाले की, अनेक ठिकाणी पेरण्या झालेल्या नाहीत. उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्याची माहिती अधिकाऱ्यांकडून मागवली आहे. तर उत्तर भारतात जोरदार पाऊस होत आहे, यमुनेला पूर आला आहे. एवढा पाऊस कधी बघितला नव्हता. मात्र आपल्याकडे अजून पाऊस नाही. नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा कमी असून कोयना, उजनीला पाणी नसल्याचे सांगत ग्लोबल वार्मिंगमुळे पावसाचे चक्र बदललं असल्याचे अजित पवार म्हणाले. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मी आम्ही तिघे आढावा घेत आहोत. खातेवाटपानंतर सर्वजण कामाला लागले असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.