मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी आज अर्थसंकल्प मांडला. अजित पवार यांनी अर्थसंकल्पाची हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेतील ओळींनी सुरवात केली तर शेवट सुरेश भट यांच्या कवितेच्या ओळी सादर करून केली.
हाच माझा देश, ही माझीच माती,
येथले आकाशही माझ्याच हाती |
आणला मी उद्याचा सूर्य येथे,
लावती काही करंटे सांजवाती ||
आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. शेतकरी, नोकरदार, स्थानिक नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा मुद्दा देखील यावेळी मांडण्यात आला.
महत्वाचे मुद्दे
- गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि कौशल्ययुक्त रोजगार या तरूणांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी येत्या ५ वर्षांत महत्वाकांक्षी योजना
- अल्पसंख्याक विभागासाठी ५५० कोटींचा निधी प्रस्तावित
- इतर मागास वर्ग बहुजन कल्याण विभागासाठी ३ हजार कोटींचा निधी प्रस्तावित
- राज्यात उद्योगाला चालना देण्यासाठी औद्योगिक वापरावरील वीज शुल्क सध्याच्या ९.३ टक्क्यांवरून ७.५% करण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे. या करसवलतीमुळे राज्याला दरवर्षी सुमारे २५०० कोटी इतके महसुली तूट होणे अपेक्षित आहे
- आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत सर्व विधिमंडळ सदस्यांना मतदार संघातील विकासकामे करण्यासाठी दरवर्षी विधिमंडळ सदस्य निधी उपलब्ध करून देण्यात येतो. या निधीत २ कोटींवरून 3 कोटी रूपये इतकी वाढ करण्यात येत आहे
- सागरी किनारी पर्यटन विकासासाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर प्रकल्प तफावत निधी उपलब्ध करण्याचे प्रस्तावित आहे. पर्यटन व्यवसायासाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी महाविद्यालयांमध्ये पर्यटन व हॉस्पिटॅलीटी पदविका व पदवी अभ्यासक्रम सुरू करणार
- मुरूड जंजीरा समुद्रकिनारा सुशोभीकरण, औरंगाबाद येथील तीन पुरातन पुलांचे नुतणीकरण, पाटण तालुक्यातील धबधबा, रामगड धबधबा, घाटमाथा ते उमरळी वॉकींग ट्रॅक, सज्जनगड रोप-वे, शिवनेरी किल्ला पर्यटन विकास इ. विविध पर्यटन स्थळांच्या विकासासाठी निधी
- सामाजिक न्याय विभागासाठी ९ हजार ६६८ कोटी रूपयांची तरतूद
- रयत शिक्षण संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त रुपये ११ कोटींचे अनुदान
- जिल्हा क्रीडा संकुलांसाठी २५ कोटी रूपयांचा निधी देण्यात येणार. बालेवाडीत आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ सुरू करण्यात येणार. कबड्डी, कुस्ती, खोखो, व्हॉलिबॉल स्पर्धांसाठी ७५ लाखांच्या निधीची तरतूद –
- नदी प्रदूषण प्रतिबंधक प्रकल्पाच्या अनुषंगाने नाग, इंद्रायणी व वालधुनी या नद्यांमध्ये सोडण्यात येणारे सांडपाणी अडवणे, प्रक्रिया करणे, सांडपाणी प्रक्रिया केंद्र स्थापन करणे, सुलभ शौचालय बांधणे, आदींसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल
- नाट्यसंमेलनाच्या निधीत वाढ करण्याचा निर्णय. त्यासाठी १० कोटी रूपयांचे अनुदान देण्यात येणार. तसेच पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ४ कोटी रूपयांच्या निधीची तरतूद
- महिला सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध आहे. प्रत्येक जिल्ह्यात महिला पोलीस स्थानक उभारणार. तसेच प्रत्येक जिल्ह्यात महिला आयोगाची कार्यालये स्थापणार. २ हजार ११० कोटींचा निधी महिला व बालकल्याण विभागाला देण्यात येणार आहे
- मराठी भाषेच्या प्रसारासाठी मुंबईत मराठी भवन उभारणार असून वडाळ्यात वस्तू आणि सेवा कर केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी १४८ कोटी रूपयांची तरतूद
- वरळीत पर्यटन संकुल उभारण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त पर्यावरण विभागासाठी २३० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यटन स्थळी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात येणार
- सॅनिटरी नॅपकिनच्या नवीन मशीनसाठी, अनुदानित नॅपकिनसाठी १५० कोटींची तरतूद
- तृतीय पंथीय हक्कांचे संरक्षण व कल्याणासाठी मंडळ स्थापन करण्यासाठी ५ कोटी निधी प्रस्तावित
- रोज १ लाख शिवभोजन थाळी देण्याचा सरकारचा मानस आहे. शिवभोजन थाळी केंद्रांवर ५०० थाळी देणार. शिवभोजन थाळीसाठी १५० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात येणार
- महाराष्ट्रात नवीन उद्योगांसाठी शासन प्रयत्नशील आहे. त्याबरोबरच स्थानिक उमेदवारांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळावे अशी शासनाची भूमिका आहे. राज्यातील ८० टक्के नोकऱ्या स्थानिकांना मिळाव्यात यासंदर्भात कायदा करणार
- सागरमाला कार्यक्रमांतर्गत किनारपट्टीवरील बंदरांसाठी वसई, भाईंदर, कालबाव़डी, मनोरा नारंगी, मालवण येथे रो-रो सेवेसाठी रुपये ६५ कोटींचा निधी, कुलाबा येथे जेट्टी उभारणार, बंदरे विकासासाठी २७६ कोटी प्रस्तावित
- उच्च व तंत्रशिक्षणासाठी १३०० कोटी रूपयांचा निधी देण्यात येणार आहे. बेरोजगारांना रोजगारक्षम बनवणार. तसेच १० वी उत्तीर्णांनाही रोजगाराचं प्रशिक्षण देण्यात येणार
- महिला धोरणाला २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. महिला बचत गटांना गतिमान करण्यासाठी १००० कोटींची खरेदी बचत गटांमार्फत करणार
- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील जुन्या बस बदलून १६०० नव्या बसगाड्यांसाठी ४०१ कोटी देण्याचे प्रस्तावित
- आरोग्य विभागासाठी ५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. राज्यात नवी वैद्यकीय महाविद्यालये उभारणार. नव्या रूग्णवाहिकांसाठी २५ कोटी रूपयांची तरतूद करणार. २० नवी डायलिसिस सेंटर सुरू करणार. तसंच ९९६ प्रकारचे उपचार मोफत देणार.
- राज्यातील मेट्रो प्रकल्पांसाठी एकूण १ हजार ६५७ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे
- हिंदूहृद्यसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर २० ठिकाणी कृषी समृद्धी केंद्रे बांधणार. त्यापैकी ४ केंद्रे मूर्त स्वरूपात आकाराला येतील. यासाठी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी सहकार्य केले. त्याबद्दल त्यांचे आभार
- महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ९ हजार ३५ कोटी रक्कमेची कर्जमाफी देण्यात आली. २ लाखापेक्षा जास्त पीककर्ज असणाऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर झाली. कर्जमाफीसाठी २२ हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्याचं काम सुरू
- राज्यातील ३१३ सिंचनाचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जलसंपदा विभागासाठी १० हजार कोटींचा निधी.
- शेतकऱ्यांना सुलभ अशी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना राज्य सरकारने जाहीर केली. शेतकऱ्यांना कर्जाच्या बोझ्यातून मुक्त करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. केंद्राच्या मदतीची वाट न पाहाता राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत केली