मुंबई – ऋषभ पंत याला वारंवार संधी देऊनही त्याच्या कामगिरीतील अपयश संपण्याचे नावच घेत नाही, त्यामुळे येत्या मालिकांमध्ये त्याला खेळविण्याचा हट्ट सोडा व अव्वल यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा याला खेळवा, असे मत भारताच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष व माजी कसोटीपटू संदीप पाटील यांनी व्यक्त केले आहे. तसेच कर्णधार विराट कोहली व संघव्यवस्थापन साहाच्या कारकिर्दीचे नुकसान करत असल्याची टीकाही पाटील यांनी केली आहे.
पंतला खेळविण्याच्या हट्टापायी भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत चांगलाच फटका बसला होता. पंतला फलंदाजीतच नव्हे तर यष्टीमागे देखील चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्याला जितकी संधी दिली गेली त्यात प्रत्येक वेळी तो अपयशीच ठरलेला आहे, मग सातत्याने त्यालाच खेळविण्याचा अट्टहास कशासाठी अशी विचारणाही पाटील यांनी केली आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेबरोबरच कसोटी मालिकेतही व्हाइटवॉशची नामुष्की पत्करावी लागली. त्यावेळी कोहलीच्या नेतृत्वावरही शंका घेतली जात असून त्याचे तसेच संघ व्यवस्थापनाने घेतलेल्या अनेक निर्णयावर आश्चर्यही व्यक्त केले जात आहे, त्यामुळे आता तरी पंतला खेळविण्याचा हट्ट सोडा व साहाच्या कारकिर्दीशी खेळू नका असा सल्लाही पाटील यांनी दिला आहे.
परदेशात जेव्हा आपण मालिका खेळतो त्यावेळी संघाला केवळ यष्टीरक्षक संघात घेऊन चालत नाही तर तो यष्टीरक्षक चांगली फलंदाजी करणारादेखील हवा असतो, हा निकष पंत पूर्ण करू शकत नाही. साहाकडे ती गुणवत्ता आहे आणि त्याने जेव्हा संधी मिळाली आहे तेव्हा ते सिद्धही केले आहे. साहाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत सातत्याने धावा केल्या तसेच यष्टीमागेही सरस कामगिरी केली मात्र, न्यूझीलंडविरुद्ध त्याला संघात स्थान मिळाले नाही याचेही आश्चर्य वाटते असेही पाटील म्हणाले.