पुणे – अभिनेते नाना पाटेकर आपल्या रोखठोक भूमिकेसाठी सर्वांनाच परिचीत आहे. नाना राजकीय भूमिका देखील स्पष्ट मांडतात. त्यांनी नुकतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं केल्या कामांबद्दल कौतुक केलं.
अजित पवार हे शांत राहून आपलं काम करत असतात. एखादी गोष्ट चुकली तर तेवढीच अधोरेखित होते. परंतु, त्यांनी केलेलं काम समोर आणलं पाहिजे, ते खरंच चांगले नेते आहेत. विशेष म्हणजे अजित पवार जेवढी कामं करतात त्याची जाहिरात कधीच करत नाहीत. आम्हाला अधिक प्रसिद्धी मिळते. परंतु, राजकारणी लोकांनी केलेल्या कामाला प्रसिद्धी मिळत नाही, अशी खंतही नाना पाटेकर यांनी व्यक्त केली.
यावेळी नाना पाटेकर यांनी ऐनवेळी पक्ष बदलणाऱ्या राजकीय नेत्यांवरही आपली भूमिका स्पष्ट केली. पक्ष बदलणाऱ्या माणसाला पाच वर्षे कोणतेही पद देऊ नका. म्हणजे कोणीही पक्ष बदलणार नाही. पक्ष बदलाला काहीतरी नियम असायला पाहिजेत. किमान शिक्षणाची तरी अट पाहिजे, असंही नाना पाटेकर यांनी नमूद केलं.