भिवंडी – वृद्ध दाम्पत्याची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील तार्थक्षेत्र वज्रेश्वरी जवळील अंबाडी रस्त्यावरील पेंढरी पाडा येथे शुक्रवारी रात्री घडली. जगन्नाथ पाटील (वय83) सत्यभामा पाटील (वय75) अशी हत्या झालेल्या पती पत्नीची नावे आहेत. अंबाडी रस्त्यालगत पाटील दाम्पत्याचे घर आहे. तेथेच ते दोघे राहत असत. तर घराजवळच त्यांची तीस एकर शेती आहे.
शुक्रवारी रात्री अज्ञातांनी पाटील दाम्पत्याची गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. दुसऱ्या दिवशी सकाळी उशीरापर्यंत हे दोघे घराबाहेर न आल्याने शेजारी राहणाऱ्या एका मुलाने खिडकीतून घरात डोकावून पाहिले असता दोघे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरु केला आहे. चोरीच्या उद्देशाने हत्या केल्याचा संशय होता. मात्र महिलेच्या गळ्यातील सोने तसेच होते. त्यामुळे ही हत्या कोणत्या कारणामुळे केली याचा पोलिस तपास करत आहेत.
दरम्यान, पाटील दाम्पत्याला दोन मुले असून कामानिमित्त ते बाहेरगावी वास्तव्यास आहेत. काही नातेवाईकांशी त्यांचा जमिनीच्या कारणावरून वादही चालू असल्याची माहिती मिळाली आहे. तर काही महिन्यांपूर्वी मुंबई वडोदरा या महामार्गामध्ये त्यांची जागा गेली होती त्याची मोठ्या प्रमाणात रक्कमही मिळाली असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. एका संशयित इसमास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अधिक तपास गणेशपुरी पोलीस आणि गुन्हे अन्वेषण शाखा ठाणे करत आहेत.