पुणे – नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्याबद्दल थोडीच माहिती उपलब्ध आहे. शाळेच्या पुस्तकात देखील थोडीच माहिती देण्यात आली आहे. पण तान्हाजी मालुसरे यांनी आपले धाडस दाखवले नसते तर इतिहास वेगळा असता. त्यांची कथा लोकांपर्यंत पोहचवण्याचा हा प्रयत्न आहे. यापुढेही काही अनसंग हिरो मोठ्या पडद्यावर घेऊन येणार असे अभिनेता अजय देवगण याने सांगितले.
नरवीर तान्हाजी मालुसरे जीवनावर आधारित ‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट येत्या १० जानेवारीला प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्ताने या चित्रपटात वीर तान्हाजी यांची भूमिका साकारणारा अभिनेता अजय देवगन, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा शरद केळकर यांनी प्रमोशनच्या निमित्ताने पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. सिनेपोलीस, सीजन मॉल येथे या अभिनेत्यांचे स्वागत खास ताशांच्या तुतारीच्या गजरात, मराठमोळ्या अंदाजात करण्यात आले.
अजय म्हणाला, तान्हाजी मालुसरे यांचा पुतळा जिथे आहे तिथे आम्ही मराठी मध्ये ‘तान्हाजी’ असा शब्दाचा उल्लेख पहिला. म्हणूनच इंग्रजी शब्दामध्ये देखील ‘H’ उल्लेख करण्यात आला आहे. तसेच गड किल्ल्याच्या संवर्धनासाठी सरकारशी आम्ही बोलणार आहोत असे देखील अजयने सांगितले.
शरद केळकर म्हणाला, जेंव्हा मला समजलं की मला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारायची आहे तेव्हा खूप मोठी जबाबदारी असल्यासारखं वाटलं. त्यासाठी मी पहिल्यापासूनच खूप मेहनत घेतली.