नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हिंसाचारात माझ्या हत्येचा प्रयत्न आणि उद्देश होता, अशी फिर्याद विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनांची अध्यक्षा आयेषा घोष हिने पोलिसांत नोंदवली.
या घटनेबाबत मी फिर्याद नोंदवली आहे, जमावाने कट करून आणि समान उद्देशाने मारहाण केली. त्यांचा उद्देश माझी हत्या करण्याचा होता. या बाबत प्रथम माहिती अहवाल तातडीने नोंदवून अरोपींना तातडीने अटक करावी, असे फिर्यादित म्हटले आहे.
आयेषाने सांगितले की, मला पाच जानेवारीला काही विद्यार्थ्यांनी सांगितले की गंगा बस स्टॉप जवळ अभाविपशी संबंधित काही जण आणि अनोळखी महिला आणि पुरूष हातात रॉड, घण आणि लाठ्या घेऊन जमले आहेत.
निखील मॅथ्यूसोबत (एम. ए. कामगारचा विद्यार्थी) त्यावेळी तेथे होतो. आम्हाला या टोळक्याने घेरले. या टोळक्यातील बहुसंख्य लोकांनी बुरखे घातले होते. त्यातील 20 – 30 जणांनी मला तेथे कायम स्वरूपी उभ्या असणाऱ्या मोटारीमागे ढकलले. मी अनेकदा विनंती करूनही मला त्यांनी सोडले नाही. त्याचवेळी रॉडने माझ्यावर हल्ला चढवला. मी खाली पडले, मला आठवते, युसीएलए लिहलेला तपकिरी स्वेटशर्ट घातलेला मध्यम उंचीचा माणुस मला आठवतो. मी त्याचा चेहरा पाहिला आहे. त्याने बुरखा घातला नव्हता. मी त्याला पाहताच ओळखू शकेन, असे घोष यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.
माझ्यावर वर उल्ल्रेख केलेल्या व्यक्तींनी सामुहिक हल्ला केला. लोखंडी रॉडने माझ्या डोक्यावर अनेक वार करण्यात आले. मी जमीनीवर पडले त्यावेळी डोक्यातून रक्तस्राव सुरू झाला. त्यातील काही जण मला लाथा घालत होते. तर काही जण माझ्या हातावर आणि शरीराच्या अन्य भागावर रॉडने वार करत होते. माझ्या छातीवर आणि पाठीवरही वार करण्यात आले, असेही या फिर्यादित नमूद केले आहे.