काठमांडू : नेपाळमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या प्राणघातक विमान अपघातानंतर या देशातील धोकादायक विमान प्रवासाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. गेल्या तीस वर्षांच्या कालावधीमध्ये नेपाळमध्ये तब्बल 28 विमान अपघात झाले असून त्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. जुन्या आणि कालबाह्य विमानांचा वापर, अयोग्यप्रकारे प्रशिक्षण दिले गेलेले विमान चालक आणि देशामधील नैसर्गिक परिस्थिती यामुळे नेपाळमध्ये विमान प्रवास धोकादायक बनत चालला आहे.
नेपाळमधील नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने 2019 मध्ये विमान वाहतुकीच्या सुरक्षेतेबाबत जो अहवाल जाहीर केला आहे, त्यामध्ये नेपाळमधील नैसर्गिक परिस्थिती हीच वाढत्या विमान अपघातांना कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. नेपाळमध्ये ठिकठिकाणी नऊ पेक्षा जास्त उंच गिरी शिखरे आहेत. ज्यामध्ये माउंट एव्हरेस्टचाही समावेश होतो. ही गिरी शिखरे विमानतळाच्या आसपासच असल्यामुळे वैमानिकांना विमान उतरवताना मोठ्या प्रमाणावर कसरत करावी लागते.
लुसका नावाच्या शहरातील विमानतळ तर एवढा संकुचित आहे की एका बाजूला उंच डोंगर आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी अशा परिस्थितीमध्ये अतिशय छोट्या धावपट्टीवर विमान उतरवावे लागते, म्हणून या विमानतळावर विमान उतरवणाऱ्या वैमानिकांना खास प्रशिक्षण दिले जाते. अशा प्रकारचे प्रशिक्षण नसेल तर अपघातासारख्या घटना घडतात. याशिवाय अजूनही नेपाळी एअरलाइन्स जुनी विमाने वापरत आहेत, त्यामुळेही ती विमाने उड्डाणासाठी योग्य नसतात.
गेल्या आठवड्यामध्ये जो विमान अपघात झाला त्यामध्ये असलेले विमान हे 42 वर्षे जुने होते. या विमानांचा वापर करणे अनेक देशांनी बंद केले आहे. डोंगराळ भागामुळे तेथील हवामानाची स्थिती सतत बदलत असते, त्याचाही फटका विमान चालवताना पायलट्सना बसतो. दृश्यमान्यता कमी झाल्यामुळेही विमान अपघात होण्याचे प्रमाण वाढत आहे. नेपाळ हे जगभरातील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र असल्याने आणि माउंट एव्हरेस्टच्या निमित्ताने अनेक गिर्यारोहक या देशात येत असल्याने त्या देशातील विमान प्रवास अधिक सुरक्षित व्हावा अशी मागणी आता करण्यात येत आहे.